प्रतिनिधी
मुंबई : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला. या वादावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा असून पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. Eknath Shinde’s appeal for government worship on Kartiki Ekadashi and not to break the tradition of the Chief Minister
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा.
फडणवीसांना पूजेचा मान मिळण्याची शक्यता
पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणी करायची याविषयीचे वाद आज मिटण्याची शक्यता आहे. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या एकत्रित बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मराठा समाजातील सर्व गट एकत्र आल्यामुळे तोडगा दृष्टीपथात आला आहे. मराठा समाजानंतर आज कोळी समाजाची बैठक आहे. त्यात कोळी समाजाचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान मिळेल असंही सांगितलं जातंय. पंढरपूरच्या शासकीय महापूजेनंतर ते त्याचं कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपूर येथे जाण्याची शक्यता आहे.
मंदिर समिती कोणता निर्णय घेणार?
23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते होत असते. यंदा दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा होणार हा पेच सरकार पुढे असताना आता मराठा आंदोलकांनी कोणत्याच मंत्र्याला येऊ न देण्याचा इशारा दिला आहे. कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता मनोज जरांगेंच्या हस्ते करावी, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यामुळे आता मंदिर समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App