विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Solapur भारतीय जनता पक्ष हा साम-दाम-दंड-भेद आणि ईडी – सीबीआयच्या माध्यमातून दहशत निर्माण करून निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. तशी ही लढत देखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देऊन आपण महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा देखील प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.Solapur
वास्तविक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकला होता. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अनेक मतदारसंघात ज्याप्रमाणे मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत, तशी मैत्रीपूर्ण लढत येथेही झाली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणत त्यांनी काडादी यांच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंचा मतदारसंघावरील दावा चूकच – सुशीलकुमार शिंदे
केवळ एक निवडणूक शिवसेनेने मागे जिंकली होती. त्या आधारावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा हा चूक आहे. हे मी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील स्पष्ट केला आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिण मधून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारात थेट लढत होत असल्याचे पाहायला मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App