विशेष प्रतिनिधी
नागपूर : CM Fadnavisपुढील 2-3 वर्षांत उद्योग, गृह यांसारख्या सर्वच क्षेत्रातील वीजेचे दर आपण कमी करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अशा प्रकारचे नियोजन ऊर्जा विभागात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवास योजनांतंर्गत देण्यात येणाऱ्या घरांमध्ये सोलार देण्याचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.CM Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची तसेच सरकारचे पुढील प्लॅन काय असणार याबाबत माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
विधानसभा निवडणुकीत पत्रकारांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हचा मोठा फटका आम्हाला बसला. विधानसभा निवडणुकीत तो फेक नरेटीव्ह तोडू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहचू शकलो. त्यामुळे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय 237 जागा महायुतीला प्राप्त झाल्या. भाजपला राजकीय जीवनातील उच्चांक 132 जागा मिळाल्या. एवढे मोठे बहुमत मिळाल्यामुळे आमची जबाबदारी देखील वाढली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोणतेही बहुमत जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असते. आव्हाने, अपेक्षा, अडचणी आणि मर्यादा असतात. परंतु या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजे. तशा प्रकारचा महाराष्ट्र तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न करायचा आहे. 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचे की, हा मंत्री पण राहिलेला नाही. मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल, काही लोकांना वाटायचे नवख्या व्यक्तीकडे काम आलेले आहे. परंतु माझ्या पहिल्या पाच वर्षांच्या कामात विदर्भाचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सोबतच महाराष्ट्रातील कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
2-3 वर्षांत वीजेचे दर कमी करू शकतो
विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात केले. 80 प्रकल्प पूर्ण केले असून अनेक प्रकल्प पूर्णत्वापर्यंत आणले. त्याचबरोबर वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह कोकणातील प्रकल्प पूर्ण केले. सर्वच क्षेत्रात मोठी भरारी त्या पाच वर्षांत घेतली. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री पदाची संधी भेटल्यानंतर ऊर्जा, सिंचन, गृहनिर्माण, गृहमंत्री अशा अनेक खात्यांचे काम केले. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा रोड मॅप आपण तयार केला आहे. पुढील 2-3 वर्षात सर्वच प्रकारचे वीजेचे दर आपण कमी करू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था ऊर्जा विभागात उभी केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्पामुळे राज्याचे चित्र बदलेल
6 नदीजोड प्रकल्पाची कामे आपण हातामध्ये घेतलेली आहे. ही कामे महाराष्ट्राचे चित्र बदलणारी आहे. विदर्भातील नदीजोड प्रकल्पामुळे 10 लाख एकर आणि 7 जिल्ह्यांचे चित्र बदलू शकेल, असे प्रकल्प हातात घेतले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
गडचिरोलीसारखे क्षेत्र बदलण्याचे काम सुरू
गडचिरोली भारतातील पुढील स्टील सिटी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्षलवाद देखील कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्या भागात आपण कधी जात नव्हतो, अशा भागात आपण जात आहे. गडचिरोलीसारखे क्षेत्र बदलण्याचे काम आपण करत आहोत. गुंतवणूकीच्या संधी ज्या येत आहेत, त्यातून विदर्भालाही औद्योगिक इको सिस्टम मोठ्या प्रमाणात उभी राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराचे नियोजन करत आहोत
सरकारने सुरू केलेल्या योजना पुढेही चालवायच्या आहेत. या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल, हे खरे आहे. पण त्याचेही नियोजन योग्य प्रकारे करत आहोत. कोणाच्या मनात शंका नको, म्हणून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. सगळ्या खात्यांमध्ये लवकरच तो जमा होईल, असे फडणवीस म्हणाले.
आवाज योजनांमधील घरांना सोलार देणार
केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. परवाच शिवराजसिंग चौहान यांनी एकाच वर्षात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 20 लाख घरे दिली आहे. हा देशातील विक्रम आहे. अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरे मिळाली नाहीत. 2022 मध्ये एसीसीच्या यादीप्रमाणे लक्ष्य ठेवले होते. ते पूर्ण केले. आवास योजनांअंतर्गत जी घरे बांधली जातील, त्या घरांमध्ये सोलार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्या लाभार्थ्यांना मोफत वीज मिळावी असा आमचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीसा यांनी सांगितले.
सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही
राजकारणात सर्व स्तराला जाऊन लोक आव्हाने निर्माण करतात. कितीही मोठे आव्हान निर्माण झाले, तरी त्याच मी धैर्यपूर्वक सामना करतो. सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही. ज्या विचारांनी मी राजकारण आलो, त्या विचाराने सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, अशी शिकवण मला मिळालेली आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही, असा विश्वास सर्वांना देतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App