विशेष प्रतिनिधी
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भाजपवर असलेली मजबूत पकड सर्वांनाच माहित आहे. पक्षावरील किंवा सरकारवरील टीका सहन न केली जाणार नसल्याचा कडक संदेश वेळोवेळी देण्यात आला आहे. तरीदेखील भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या पुन्हा मोदी सरकारवर बरसल्या आहेत. आता त्यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रेल्वे मंत्रालयाला लक्ष्य केले आहे. “लोकलमध्ये महिला मुलींवरचे वाढते हल्ले पहाता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय? महिला पोलिसा का येत नाहीत? कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याच जणींना जीव गमवावे लागले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तुम्ही मध्य रेल्वेची चौकशी करा,” असं चित्रा वाघ यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.BJP leader Chitra Wagh once again targeted Modi govt
मुंबईत रात्रीच्यावेळी लोकलनं प्रवास करताना महिला डब्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण रात्री १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याची तक्रार करणारा एक व्हिडिओ महिला प्रवाशानं पोस्ट केला होता. त्यावरून चित्रा वाघ यांनी मध्य रेल्वेला जाब विचारला आहे. आपल्याच केंद्रातील सरकारवर, मंत्र्यांवर टीका करण्याचा चित्रा वाघ यांचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशातील ज्येष्ठ आदिवासी नेते व केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलास्ते यांच्यावर कडक टीका केली होती.
फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्यांची तुलना भाजपच्याच खासदार व ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासोबत केली होती. रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांना कडक आदेश देत असताना त्यांची जीभ घसरली होती. ठेकेदारांनी रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे चांगले बनवले. पण, गावात पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे, असं फग्गन सिंह कुलस्ते म्हणाले होते. त्यानंतर महिलांचा अपमान केला असा आरोप करत अनेकांनी कुलस्ते यांच्यावर कारवाईची मागणी केली. पण, मी महिलांचा अपमान होईल असं काहीही बोललो नाही. मी केलेलं वक्तव्य वाईट नाही, असं म्हणत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं कुलस्ते यांनी सांगितलं होतं. पण चित्रा वाघ यांनी ट्विट करत फग्गन सिंह कुलस्ते यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी रस्त्याची केलेली तुलना ही निषेधार्ह आहे. महिलांचा अपमान होणारी भाषा राजकीय नेत्यांकडून वापरलं जाणं अतिशय गंभीर आहे. या घटनेची पंतप्रधान मोदी यांनी दखल घ्यावी. तसेच राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्रीय मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अर्थात त्याची पक्षाने व राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App