विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखीही बांधली. कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह दिल्लीला रवाना झाले.
दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास दहा मिनिटं एकांतात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेतील नाराजीवर चर्चा?
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि पक्षांतर्गत असंतोषाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिवसेनेतील काही मंत्री नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची विमानतळावरील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
‘चिंता करू नका’ म्हणत अमित शाहांचं आश्वासन?
दरम्यान, शिवसेनेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी ‘चिंता करू नका’, असं आश्वासन अमित शाह यांनी शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मात्र, या दहा मिनिटांच्या चर्चेत नेमके कोणते मुद्दे उपस्थित झाले आणि अमित शाह यांनी शिंदेंना नेमकं काय आश्वासन दिलं, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुढील काळात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App