विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामतीच्या पावसात अजितदादा भिजले, हौशा नवशा गवशांसकट सगळ्या विरोधकांवर जोरदार बरसले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवारी प्रथमच बारामतीतील मिशन हायस्कूल ग्राउंडवर जनसन्मान मेळावा घेतला. या मेळाव्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून अजित पवारांना भाषण करावे लागले. Ajit pawar targets opposition from baramati in rains
अजितदादाही भर पावसाची संधी घेऊन विरोधकांवर जोरदार बरसले. त्याचवेळी त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातून घोषित केलेल्या योजनांचा पुन्हा पाढा वाचला. अजितदादांनी भर पावसात भाषणाला सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन अजितदादांच्या नावाने जयघोष केला.
अजित पवार म्हणाले :
महाराष्ट्रातील तब्बल 2.50 कोटी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, तर वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मी शब्दाचा पक्का आहे, फक्त महिलांसाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 10000 रुपयांचे विद्यावेतन आम्ही सुरू केले. मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे.
आता एवढे केल्यानंतरही विरोधक आमच्यावर टीका करतात, परंतु त्या टीकेचा मी विचार करत नाही. आता विधानसभेला महायुतीलाच निवडून द्यायचे आहे. हौशे, नवशे, गवशे कोणी येतील आणि काहीही सांगतील. त्यांना आता भुलू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी काही सांगितले तर अजितदादांवर आमचा विश्वास आहे म्हणून सांगा. हा अजितदादा शब्द देणारा आहे. एकट्या बारामतीचा विचार केला तरी बारामतीमध्ये 181 कोटी रुपये वर्षाला येथील महिलांना मिळणार आहेत. आम्ही खोटे बोलणार नाही. सत्ता येते, जाते. इथे कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. म्हणून सत्ता ही गोरगरिबांच्या हितासाठी राबवायचे असते.
शेतकरी प्रश्नांवर अमित शाहांशी चर्चा
आपल्याला असे जनसन्मान मेळावे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात करायचे आहेत. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. विकासाचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे. मला बारामती बघत बघत इतर तालुके पुणे, महाराष्ट्र फिरायचं आहे. त्यामुळे इथल्या लोकांनी जबाबदारी पाळावी. मी कालच दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो, त्यांना मी साखरेची एसएमपी वाढली पाहिजे असे सांगितले, त्याचबरोबर कांद्याची दुधाची यापुढे पावडर आयात केली जाणार नाही, असेही मी सांगितले आहे. केंद्र सरकारने तसा निर्णय घेतल्यावर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App