वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम : भाजपने मिशन दक्षिण भारत फार गांभीर्याने घेतले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा तमिळनाडू दौरा, हैदराबाद महापालिकेच्या प्रचारात शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सकट अनेक केंद्रीय मंत्र्यांनी उतरणे यापाठोपाठ आता केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही भाजपने तितक्याच गांभीर्याने घेतल्या आहेत. amit shah latest news
केरळमध्ये अमित शहा आणि योगी यांच्या बरोबरच भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्याही सभा होणार आहेत. भाजपने येथे १०० मुस्लिम आणि ५०० ख्रिश्चन कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीत मुस्लिम उमेदवार न उतरविण्याचा भाजपवर विरोधक नेहमी आरोप करतात. त्याला केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीद्वारे भाजपने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हैदराबादमध्ये अमित शहांसह केंद्रीय मंत्र्यांनी प्रचारात उतरणे हा टीकेचा विषय झाला होता. पण कोणतीही निवडणूक छोटी नसते, असे अमित शहांनी उत्तर देऊन टीकाकारांना गप्प करण्याचा प्रयत्न केला होता. आता केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराला येणे हा देखील टीकेचा विषय होऊ शकतो. परंतु, मूळात त्यांचे केरळात प्रचारात उतरणे हा भाजपच्या मिशन दक्षिण भारतचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, हे स्पष्ट आहे.
तिथे भाजपाने सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करून पंचायत निवडणुकीत भाजपाने तब्बल १०० पेक्षा जास्त मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. केरळमध्ये ८, १०, १२ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पंचायत स्तरावरील या निवडणुकीसाठी भाजपाने ५०० ख्रिश्चन आणि ११२ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. इतक्या मोठया प्रमाणात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना उमेदवारी देणे हा भाजपाचा अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाचा एक भाग मानला जात आहे.
केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची मिळून लोकसंख्या ४५% आहे. हिंदुंची लोकसंख्या ५५ % आहे. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया भक्कम आहे. पण संघ परिवार त्या राज्यात मजबूत स्थितीमध्येही असूनही भाजपाला त्याचा लाभ मिळालेला नाही. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून सहा महिने बाकी आहेत. केरळमध्ये स्वत:चा राजकीय पाया भक्कम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
१९८० सालापासून केरळमध्ये सीपीआयएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफची आलटून-पालटून सत्ता आली आहे. मजबूत हिंदुत्वाचा आधार घेऊनही भाजपाला या राज्यात फायदा झाला नाही. पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्य़ात पाया भक्कम करण्यासाठी भाजपाने ख्रिश्चन आणि मुस्लिमांना मोठया प्रमाणात उमेदवारी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App