नाशिक : शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या इतिहासात बारामतीकरांनी आतापर्यंत त्यांना कधीच निराश केले नव्हते. “शरद पवार बोले आणि बारामती डोले” अशी स्थिती तब्बल 55 वर्ष कायम होती. पण गेल्या दोन वर्षांपासून पवारांच्या राजकीय प्रतिमेला बारामतीतून धक्के बसले. पवारांचे घर राजकीय दृष्ट्या फुटले. त्यानंतर बारामतीकरांनी काका आणि पुतण्यांना आलटून-पालटून कौल दिले. त्यामुळे बारामतीकरांच्या कौलात मूळात विभागणी झाली. ती विभागणी आता अधिक रुंदावली असून ती शरद पवारांच्या अख्ख्या पॅनेलचा पराभव करण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
शरद पवारांना स्वतःला कुठल्याच निवडणुकीत कधीही पराभव पाहावा लागला नाही. याला अपवाद फक्त भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवडणुकीचा होता. बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांनी शरद पवारांचा फक्त एका मताने पराभव केला होता. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीत पवारांचा पराभव होऊ शकत नाही, हे रेकॉर्ड तुटले होते. आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांनी उभ्या केलेल्या सगळ्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर “शरद पवार म्हणजे निवडणुकीत हमखास यश” हे समीकरण देखील बारामतीकरांनी संपुष्टात आणले.
शरद पवारांची चलाखी
अर्थात या निवडणुकीत पवारांनी चलाखी केली होती. निवडणुकीतल्या पराभव झाल्याचे खापर सुप्रिया सुळे यांच्यावर फुटू नये. त्यांच्या नावावर पराभवाचे रेकॉर्ड तयार होऊ नये, यासाठी पवारांनी त्यांच्या बळीराजा पॅनेलचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविले नाही. ते त्यांनी अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याच्याकडे दिले होते. त्यामुळे जिंकून आला तर आपला नातू आणि पराभूत झाला, तर अजित पवारांचा पुतण्या, असे समीकरण पवारांनी परस्पर बसविले होते.
या निवडणुकीतल्या पराभवामुळे युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. अजित पवारांचा सख्खा नातेवाईक पुन्हा हरला. सुप्रिया सुळे यांचे विजयाचे रेकॉर्ड पवारांनी कायम ठेवले. पण बळीराजा हे पॅनल युगेंद्र पवारांनी तयार करून उभे केले नव्हते, तर ते शरद पवारांनी तयार करून उभे केले होते. बारामतीकरांनी त्या अख्ख्या पॅनलचा पराभव केला, ही राजकीय वस्तुस्थिती मात्र लपून राहिली नाही.
अजितदादांना तळ ठोकावा लागला
21 उमेदवार आणि 19 हजार मतदान अशा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांना बारामती तळ ठोकावा लागला. शरद पवारांनीच “संस्कारित” केलेल्या चंद्रराव तावरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याशी लढत द्यावी लागली. संपूर्ण निवडणूक प्रतिष्ठेची करावी लागली. साखर कारखान्यांच्या इतिहासात घडले नाही, ते घडवून आणावे लागले. राज्याचा उपमुख्यमंत्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढतोय, असे आत्तापर्यंत कधी दिसले नव्हते, ते माळेगाव मध्ये अजित पवारांच्या रूपाने दिसले. ते स्वतः पहिल्या फेरीत निवडून आले. राज्यकर्त्यांनी साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नसते, असे पवारांना मतमोजणीच्या दिवशी सांगावे लागले.
बारामती नाही उरली एकतर्फी
एरवी पवारांच्या चलतीच्या काळात असली निवडणूक शरद पवारांनी किंवा अजित पवारांनी मुंबई आणि दिल्लीत बसून “हँडल” केली असती. पण भाजपच्या सत्ता काळात त्यांना ते शक्य झाले नाही. चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या वर्चस्वाशी चांगली टक्कर दिली. बारामती आता कुठल्याच पवारांसाठी एकतर्फी राहिली नाही, हे ठळक चित्र माळेगावच्या निवडणुकीने दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App