न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, ब्रिटिश पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल यांनी सार्वजनिक गणेशोत्सवा विषयी प्रतिकूल अभिप्राय दिले होते. पण जनतेचा गणेशोत्सवाला प्रतिसाद एवढा जबरदस्त होता की त्यांचे प्रतिकूल अभिप्राय जनप्रवाहात कधी वाहून गेले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही…!!Justice M. G. Ranade, Gopal Krishna Gokhale and Valentine Chirol opposed Sarvajanik Ganeshotsav, but failed miserably
लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू करण्याचा काळ अतिशय संघर्षशील असा होता. किंबहुना टिळकांनी सुरू केलेली कुठलीच गोष्ट ब्रिटिश राजवटीला मान्य नसल्याने ती नीट पार पडू द्यायची नाही हा चंगच त्यांनी बांधला होता. ब्रिटिशांनी सुरुवातीपासूनच गणेशोत्सवावर आक्षेप घेतले आहेत.
अर्थात ब्रिटिशांनी टिळकांच्या गणेशोत्सवावर आक्षेप घेणे यात विशेष असे काही नाही. कारण ते परकीय राज्यकर्ते होते. पण न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या स्वकीय मवाळ नेत्यांनी देखील सुरुवातीला गणेश उत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर आक्षेप नोंदवले आहेत. “घरातला गणपती रस्त्यावर आणणे गैर आहे”, अशा भाषेत या दोन नेत्यांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर टीका केली आहे. परंतु या टीकेचे रूपांतर अवघ्या दोनच वर्षांमध्ये बदलून गेल्याचे इतिहास सांगतो.
याला एकमेव कारण म्हणजे जनतेने सार्वजनिक गणेशोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. या प्रतिसादापुढे मावळांचा विरोध मावळून गेला किंबहुना त्यांच्या विरोधाला कोणते स्थानच उरले नाही. त्यामुळे उत्सवात सहभागी होण्याखेरीज त्यांना पर्याय राहिला नाही.
मुंबईत न्यायमूर्ती रानडे एका गणेशोत्सवाला पानसुपारीचा उपस्थित राहिल्याची नोंद आहे. त्याचबरोबर गोपाळ कृष्ण गोखले हे विंचूरकर वाड्यातील गणेशोत्सवाच्या पानसुपारी हजर राहिल्याचीही नोंद आहे.लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल हे तर टिळक पंथाचे जहाल नेते होते.त्यामुळे त्यांनी पंजाब आणि बंगालमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला त्यात विशेष काही घडले नाही.
वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांपेक्षावेगळा अभिप्राय लोकमान्य टिळकांचा राजकीय विरोधक पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल याचा आहे. हाच तो चिरोल की ज्याच्या विरुद्ध खटला लढवण्यासाठी टिळकांनी लंडन गाठले होते.टिळक आणि व्हॅलेंटाईन चिरोल यांचे हिरवळ यांचे नातेच “अहिनकुला”चे असावे. कारण टिळकांच्या टिळकांना त्यानेच Father of the Indian unrest असे संबोधले. वास्तविक पाहता टिळकांना त्याने दूषण दिले होते. पण नंतर “भारतीय असंतोषाचे जनक” ही बिरुदावली टिळकांसाठी भूषण ठरली. कारण त्यांचे नेतृत्व अखंड भारतातील सर्वांसाठी लांब ललामभूत ठरले.
याच चिरोल यांनी गणेशोत्सवा संदर्भात नोंद केली आहे. ते म्हणतात की, गणपती उत्सवाची नवीन टूम काढून गणेश मंडळ्या स्थापन करून आणि तरुण तालीम बाच मंडळींचे मेळे तयार करून लोकांवर आपली छाप पाडण्याची युक्ती टिळकांनी काढली ती खरोखरच अद्वितीय होती. टिळकांना सरकारला जे आग्रहपूर्वक सांगायचे होते ते जनतेच्या मुखातून सांगू लागले. मेळ्यांची युक्ती त्यांना फारच अनुकूल ठरली. गणपती उत्सवामुळे टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीचे क्षेत्र फारच विस्तृत झाले. धार्मिक उत्सव म्हणून गणपती उत्सवाला ब्रिटिश सरकारला धडपणे विरोधही करता येईना आणि टिळकांच्या चळवळीस हवा तसा अटकाव देखील करता येईना गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन टिळकांनी ब्रिटिशांची राजकीय कुचंबणा करून ठेवली.
व्हॅलेंटाईन चिरोल यांचा अभिप्राय पुरेसा बोलका आहे. ब्रिटिश सरकारची टिळकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची इच्छा असूनही नुसताच चडफडाट करण्याशिवाय ब्रिटिशांकडे पर्याय उरला नसल्याचेच यातून दिसून येते.याच सार्वजनिक गणेशोत्सवाने टिळकांचे नेतृत्व अखिल भारतीय स्तरावर नेले आणि नंतर अधोरेखितही केले.
टिळकांच्या नेतृत्वाच्या सुरुवातीच्या काळातच ६०० छोट्या – मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्याच्या बातम्या केसरीने प्रसिद्ध केलेल्या आहेत. यात “अहत तंजावर तहद पेशावर” अखंड हिंदुस्थानातल्या बातम्या आहेत. क्वेट्यापासून ढाक्यापर्यंत आणि काश्मीरपासून कोलंबोपर्यंत मोठमोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाल्याच्या या बातम्या आहेत.या पार्श्वभूमीवर टिळकांच्या ब्रिटिश आणि भारतीय विरोधकांनी दिलेले अभिप्राय टिळकांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच करणारे ठरल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App