विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरे जमीनदोस्त करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीनं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली.Take action against builder in Ambil Odha case, otherwise complaint against Commissioner of Police to Human Rights Commission, Prakash Ambedkar warns
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडण्याचा कुठलाही आदेश दिला नव्हता. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आले नव्हते. जून, जुलैमध्ये कारवाई करु नये, असे न्यायालयाचे आदेश असताना पोलिसांनी कारवाईला संरक्षण कसं दिलं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पावसाळ्यात कुणालाही बेघर करायचं नाही असे निर्देश असतानाही कारवाई झाली. कोण-कुणाच्या पाठीमागे आहे हे पाहता संबंधित बिल्डरवर कारवाई व्हावी. अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशाराही आंबेडकर यांनी दिलाय. गृहमंत्री यात काही कारवाई करतील असं वाटत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केलीय.
वंचित बहुजन आघाडीच्या सहाय्याने आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुदार्बाद अशा घोषणा दिल्या.
मुदार्बाद मुदार्बाद अजित पवार मुदार्बाद अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.
ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App