विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’चा शुभारंभ केला. फार्मर कप ही केवळ स्पर्धा नसून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी चळवळ आहे. तसेच या उपक्रमात 18,000 गटांच्या माध्यमातून 2.50 लाख शेतकरी सहभागी झाले असून भविष्यात ही मोहीम 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधानमंडळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे.
– फिजिटल मॉडेल विकसित
फार्मर कप ही लोकसहभागावर आधारित सार्वजनिक-खासगी भागीदारीची (Public-Private Partnership) यशस्वी संकल्पना आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य सरकार एकत्रितपणे हा उपक्रम राबवत असून सरकारच्या विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणावर संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत. फार्मर कपमुळे लोकसहभाग प्रभावीपणे वाढला असून ‘फिजिटल’ (Physical + Digital) मॉडेल विकसित झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
– सामूहिक श्रमामुळे मोठी बचत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी गटशेती हा प्रभावी पर्याय आहे. गेल्या वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांनी सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या एकरी उत्पादनात 71% ची वाढ नोंदवली. कृषी निविष्ठांची सामूहिक खरेदी केल्यामुळे प्रति एकर सरासरी ₹1584 ची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे मजुरीत प्रति एकर सुमारे ₹6000 ची बचत झाली. यामुळे निव्वळ नफ्यात 63% ची वाढ झाली आहे.
राज्य सरकारच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भगवान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच SMART प्रकल्प’ याशिवाय केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ यांसारख्या विविध योजनांचा गटशेतीशी प्रभावी समन्वय साधल्यास शेती अधिक लाभदायक होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
– आव्हानात्मक वर्ष
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदाचे वर्ष एल निनोच्या प्रभावामुळे काहीसे आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता गावांमधील जलसंधारणाच्या संरचनांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. ‘गाळमुक्त धरण – गाळमुक्त शिवार’ अभियानाच्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.
सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देत प्रत्येकाने फार्मर कप जिंकण्याचा प्रयत्न करावा, मात्र या चळवळीत सहभागी झालेला प्रत्येक शेतकरी आधीच विजेता झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार समाधान आवताडे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App