विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्यंत अमानुष आणि राक्षसी अत्याचार-हत्या प्रकरणाचा विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाचे संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत असून, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच “असाच न्याय संतोष देशमुख आणि मालेगाव प्रकरणातही द्या,” अशी मागणी त्यांनी केलीये.
नसरापूर घटनेनंतर पीडित कुटुंबाची भेट घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या ऐतिहासिक निकालानंतर राज्य सरकारच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले, मात्र सोबतच इतर प्रलंबित खटल्यांकडे लक्ष वेधले. जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांचे कौतुक केले पाहिजे की त्यांनी या प्रकरणात विशेष तत्परता दाखवली, ज्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत या नराधमाला फाशीची शिक्षा झाली. यामुळे पीडित कुटुंबाला आणि महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.”
यासोबतच “असाच कडक आणि वेगवान न्याय आता संतोष देशमुख हत्याप्रकरण, महादेव मुंडे आणि मालेगाव येथील ३ वर्षीय मुलीच्या अत्याचार प्रकरणात सुद्धा लावायला हवा. हे खटलेही तातडीने निकाली काढून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, हीच आमची मागणी आहे,” असे मनोज जरांगे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात मी उभा राहतो
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी आणि आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही स्वतः, सरकार आणि बच्चू कडू देखील लक्ष ठेवून आहोत. रोहित पवार देखील शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि तेही यात सक्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः नेहमीच आघाडीवर असतो आणि यापुढेही जात राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App