विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या 1356 वरून 2399 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याकरीता गठीत राज्य आरोग्य हमी सोसायटी नियामक परिषदेची बैठक संपन्न झाली.
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन 2399 उपचारांना तसेच ₹5 लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या कॉर्पस फंड निधीतून हृदयप्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण आदी सह 9 विविध उपचारांची शिफारस यावेळी मान्य करण्यात आली.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेत सुचीबद्ध असलेल्या रुग्णालयांचे तालुकानिहाय मॅपिंग करावे. संबंधित तालुक्यात 30 खाटांचे एकही रुग्णालय नसल्यास, अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या रुग्णालयात योजनेचा लाभ देऊन त्यांच्या देयकाच्या अदागीची वेगळी व्यवस्था निर्माण करावी. तसेच अशा तालुक्यामध्ये 30 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी खाजगी रुग्णालयांना आमंत्रित करून सुविधा द्याव्यात. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी.
जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना त्यांची देयके वेळेत देण्यात यावीत. जेणेकरून ती रुग्णालये रुग्णांना दर्जेदार उपचार देतील. तसेच या योजनेतील उपचार, रुग्णालये, लाभ यांची माहिती मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप तयार करावे. त्यामध्ये चॅटबॉटद्वारे सर्व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने गेल्या 6 महिन्यात अत्यंत गतीने कामात सुधारणा करून उत्तम काम केले आहे. योजनेच्या अंमलाबजावणीसाठी अधिक गतीने व पारदर्शकपणे काम करावे, जेणेकरून पुढील काळात देशातील पहिल्या तीनमध्ये राज्याचा क्रमांक येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
बैठकीत घेण्यात आलेले अन्य महत्वाचे निर्णय :
✅प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करता येऊ शकतील अशा 25 उपचारांचा योजनेत समावेश ✅सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे योजनेत समाविष्ट करण्यात येणार ✅उपचारांच्या दर निश्चितीला मान्यता ✅वैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्यास मान्यता ✅रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्र धारक रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देण्यात येणार ✅योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, नगर विकास विभागांच्या रुग्णालयांचा सहभाग वाढविण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात येणार ✅समग्र यादीतील राज्याचे 438 उपचार टीएमएस 2.0 प्रणालीशी सुसंगत करण्यात येणार
यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते तर मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री अदिती तटकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App