विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत.Uddhav Thackeray
“ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा” असा नारा देत दोन्ही बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत पक्षाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईनद्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी दुपारी 3 वाजता हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करत शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना सांगितले.
राष्ट्रवादीने जारी केलेल्या निवेदनात काय म्हटले?
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राच समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविध आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’ साठी हट्ट धरून बसलं आहे.
खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं कि, कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी.
तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
हिंदी सक्तीवरून आव्हाडांची सरकारवर टीका
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजप 24 तास फक्त राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे. कुठली भाषा शिकायची हा इच्छेचा प्रयत्न आहे. सक्तीचा नाही, असेही ते म्हणालेत. मला फ्रेंच शिकायचे असेल ते शिकेन, जर्मन शिकेन पण तुम्ही सक्ती का करता? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मराठी माणसांना वेडे समजता का?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री काय बोलत नाही. बैठकीबाहेर सक्ती नको बोलतात, मग बैठकीत मूग गिळून गप्प बसता का? तुमच्या समोर विषय येतात. त्यात चर्चा होते, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होतो. त्यानंतर वाद झाल्यानंतर तुम्हाला 10-15 दिवसांनी जाग येते. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे सांगा. मराठी माणसांना वेडे समजता का…? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App