विशेष प्रतिनिधी
जालना : Babanrao Lonikar वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना अखेर उपरती झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या टीकात्मक भाषणानंतर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सार्वजनिक समज दिल्यानंतर लोणीकर यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही.”Babanrao Lonikar
वादग्रस्त वक्तव्यामुळे वादळ उठले
एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर यांनी भाजपविरोधी ट्रोल करणाऱ्यांना उद्देशून अपमानास्पद शब्द वापरत, “त्याच्या मायचा पगार मी केला… पेरणीसाठी पैसे आम्ही दिले… कपडे, चप्पल, डबा, मोबाइल आम्ही दिले, आणि हेच लोक आमच्यावर टीका करतात,” असे वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला.
हे वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली दखल
पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट यावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, “लोणीकरांचे वक्तव्य चुकीचे आहे, कुणालाही अशाप्रकारे बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत, मालक नव्हे. त्यामुळे त्यांना योग्य ती समज देण्यात येईल.”
लोणीकर यांचा माघार घेण्याचा निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी माझ्या बोलीभाषेत बोललो होतो, काही निवडक लोकांवर माझी टीका होती. मात्र मी कधीच सामान्य जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. मी गरिबांच्या बाजूनेच उभा आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात काही बोलणार नाही. शेतकऱ्यांना मी हजार वेळा माफी मागायला तयार आहे.”
‘गावाकडची बोली’ आणि स्पष्टीकरण
लोणीकर यांनी आपल्या वादग्रस्त भाषेचे समर्थन करताना सांगितले, “गावात आम्ही बापाला बापच म्हणतो, मुलाला कार्टा म्हणतो, ही आमची बोलीभाषा आहे. मी कुणाचाही अपमान करण्याच्या हेतूने बोललो नव्हतो.”
संजय राऊतांवरही निशाणा
आपल्या स्पष्टीकरणात लोणीकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “राऊत यांनी महाराष्ट्राची वाट लावली. ते एकेरी भाषेत बोलतात. मी तुरुंगात गेलेलो नाही. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत
फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय ठाम होती :
“पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणतात, मग आम्ही मालक कसे होऊ? त्यामुळे अशा वक्तव्यांना आमच्याकडून पाठिंबा असू शकत नाही. लोणीकरांनी चुकीचं वक्तव्य केलं आणि त्यांना याची समज देण्यात येईल.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App