प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी शनिवारी बीडमधील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले. राज्यातील सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याविरोधात योग्य ती कारवाई सरकारने करावी, असे ते म्हणालेत.Sharad Pawar
शरद पवारांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी मोदींचे कौतुक करत त्यांना दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बाजीराव पेशवे, महादजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे घोड्यावरील पूर्णाकृती पुतळे उभारण्याबाबत नवी दिल्ली महापालिकेला योग्य ते निर्देश देण्याचे आवाहन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले.
काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला
शरद पवार म्हणाले, बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. पण आजी जी बीडची अवस्था आहे तशी यापूर्वी केव्हाच नव्हती. शांत व समन्वयाने सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीडला ओळखतो. मी स्वतः जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे 6-6 सदस्य निवडून आले होते. तिथे एकप्रकारचे सामंजस्याचे वातावरण होते. पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम आपल्या गत काही महिन्यांत दिसून येत आहेत.
माझे स्पष्ट मत आहे की, राज्य सरकारने यात कुणाचा हात आहे याचा विचार न करता जो कुणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करेल, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक धोरण आखावे. त्यातून बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी.
राज्यात सर्वत्र वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थितीत बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर कारवाई करावी. कुणी सत्तेचा गैरवापर व लोकांमध्ये जात व धर्म यांच्यातील काही अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सरकारने त्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, असे शरद पवार म्हणाले.
AI मुळे शेती क्षेत्रात क्रांती होईल
शरद पवारांनी यावेळी एआय तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ऊसाचे दर एकरी उत्पादन पाहता ऊसातील साखरेचे प्रमाण वाढेल. ऊसाचा धंदा अधिक सोयीचा व परवडणारा होईल. एआयमुळे हा चमत्कार होऊ शकतो. हे तंत्रज्ञान आणण्याचा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. मला आनंद आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठक होणार आहे. त्यात जवळपास 300 प्रतिनिधी सहभागी होतील. त्यांच्यासमोर ये तंत्रज्ञान दाखवले जाईल. हा क्रांतीकारक निर्णय महाराष्ट्रातून सुरू होईल.
शेतकरी आत्महत्येवर चिंता व्यक्त
शरद पवारांनी शेतकरी आत्महत्येवरही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे, बीड, अमरावती बाबतची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्ही थोडी फार माहिती काढली. ठिकठिकाणची माहिती एकत्र करत आहोत. केंद्र सरकारने त्याबाबत धोरण आखावे. त्यांनी मदत करण्यासाठी नीती ठरवावी हा आग्रह धरणार आहोत. या कामात लक्ष घातले जाईल. सरकार याविषयी कठोर पाऊल उचलेल असा विश्वास आहे.
जय पवारच्या साखरपुड्याला जाणार का?
पत्रकारांनी यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा आहे, तुम्ही जाणार का? असा प्रश्न शरद पवारांना केला. त्यावर ते चांगलेच भडकले. हा काही प्रश्न आहे का? असे ते संतापाच्या भरात म्हणाले.
मल्हार सर्टिफिकेशनवर खडेबोल
राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानांतूनच मटण खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवारांनी या मुद्यावरून त्यांना खडेबोल सुनावले. राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा नसल्याचे ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App