नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप 23 जागांवरून 9 जागांवर आला. पण या पराभवातून धडा शिकण्याची भाजपने तयारी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्र भाजपचे प्रभारी केले. अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी केले. त्या पाठोपाठ महाराष्ट्र भाजपमध्ये फार मोठ्या फेरबदलांची चर्चा सुरू झाली. BJP leaders ready to do course corrections in organisation after defeat, but MVA on the brinks of split after victory
भाजपच्या वरिष्ठ 16 नेत्यांची टीम तयार करून पराभवाचा अभ्यास करून त्यातील उणीवांवर मात करण्यासाठी अहवालही मागितले गेले. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होऊन “कोर्स करेक्शन” करण्याची तयारी सुरू झाली. यामध्ये अगदी प्रदेशाध्यक्ष बदलण्यापासून ते विविध पदाधिकारी बदलण्यापर्यंतची चर्चा ऐरणीवर आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली. पक्षाने त्यांना सबुरीचा सल्ला देत उपमुख्यमंत्री पदाचे काम सुरू ठेवण्यास सांगितले. मात्र त्याच वेळी पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे देखील सूचित केले. या सगळ्यातून महाराष्ट्र भाजप पराभवातून धडा शिकण्याच्या तयारीत असल्याचा राजकीय संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला.
– यशातून फुटीकडे
त्याउलट महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाले. त्यांचे 31 खासदार निवडून आले त्यानंतर शरद पवारांनी पुढाकार घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली, पण त्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हजर राहिले नाहीत. यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीत महाविकास आघाडीने विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्यावर चर्चा झाली. ठाकरे + पवारांनी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली.
मात्र प्रत्यक्ष जागा वाटपात सर्वच पक्षांनी स्वबळ आजमावायचे ठरवत किमान 100 जागांची मागणी केली. त्यामुळे 288 जागांच्या विधानसभेत तीन पक्षांना प्रत्येकी 100 जागा कशा द्यायच्या??, हा प्रश्न तयार झाला आणि हा बोचरा सवाल नाना पटोले यांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना केला. त्या पाठोपाठ काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बळ संचारले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या पराभवातून धडा घ्या, असा परखड सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. काँग्रेस आणि शिवसेना यांनी 288 जागांवर लढायची तयारी सुरू केली. पवारांनी देखील आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने गावागावांमध्ये दौरे करण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश काढले. ते स्वतः बारामती तालुक्यात तीन दिवस दुष्काळी गावांना पुन्हा भेटी देणार आहेत. महाविकास आघाडी 31 जागा जिंकल्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये “स्वबळ” संचारल्याचे दिसून आले. विजयी झाल्यानंतर स्वबळातून जास्तीत जास्त वाटा खेचून घेण्याची तयारी सुरू झाली आणि ती स्पर्धात्मक पातळीपर्यंत पोहोचली.
– पवारांच्या गोटात चिंता
त्यामुळे लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर देखील महाविकास आघाडी तुटण्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. जागा वाटपाच्या खडकावर महाविकास आघाडीचे तारू फुटणार अशा बातम्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीनंतर देखील आल्याने आघाडीमध्ये विशेषतः शरद पवारांच्या गोटात चिंता निर्माण झाली. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून आपल्या मूळ पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याच्या बातम्या आता मराठी माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत.
त्यामुळे लोकसभेतल्या पराभवातून धडा घेऊन भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी तर “कोर्स करेक्शन” सुरू केले, पण विजयाचा धडा मिळून महाविकास आघाडी मात्र फुटीच्या दिशेने निघाली आहे का??, असा सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App