विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेल्या पाच दिवस उलटून गेलेत. छत्रपती संभाजी राजे आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहाखातर त्यांनी आज एक घोट पाणी घेतले, पण इथून पुढे पाणी घेणार नाही,असे ते म्हणाले. डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला देखील त्यांनी नकार दिला. manoj jarange agitation for maratha reservation
छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन करून पाणी पिण्याचे आवाहन केले. समाजासाठी तुमची तब्येत व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. तब्येत व्यवस्थित राहिली तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे काम करता येईल, असे संभाजी राजे यांनी जरांगे पाटलांना सांगितले. आंदोलन स्थळी असलेल्या अनेक ज्येष्ठांनी जरांगे पाटलांना तेच आवाहन केले. त्यानंतर जरांगे पाटलांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण आपण नंतर मात्र पाणी पिणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आमदार – खासदारांचे राजीनामा नाट्य
दरम्यानच्या काळात आज दिवसभरात मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार – खासदारांचे राजीनामा नाट्य रंगले. हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आंदोलकांच्या मागणीनुसार आपल्या लेटरहेडवर राजीनामा लिहून तो त्यांच्याकडे दिला. लोकसभा अध्यक्षांना उद्देशून हेमंत पाटलांनी तो राजीनामा लिहिला आहे. त्याच वेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आमदारकीच्या राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.
पण मनोज जरंगे पाटलांनी त्यावर वेगळी भूमिका घेतली. मिळालेल्या पदांचे राजीनामे मराठा समाजाच्या नेत्यांनी देऊ नयेत मराठा समाजातल्या आमदार खासदारांनी राजीनामे देऊन आपली संख्या कमी करू नये. उलट मुंबईकडे कुच करावे असे “आदेश” जरांगे पाटलांनी आमदार खासदार यांना दिले.
या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणारे आरक्षण सरकार देऊ इच्छिते त्याला विशिष्ट वेळ लागतो, असे फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळाने फडणवीसांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निवेदन दिले.
मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवल्या. त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. त्या आंदोलनाचा फटका खासदार संजय राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांना बसला. नंतर मात्र त्यांचे नियोजित कार्यक्रम व्यवस्थित पार पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App