कुणाची हुडी, तर कुणाचा मास्क आणि खोटी मिशी; महाराष्ट्रातल्या फसवा फसवीची ही तर अजब कहाणी!!
नाशिक : कुणाची हुडी, तर कुणाचा मास्क आणि खोटी मिशी; महाराष्ट्रातल्या फसवाफसवीची ही तर अजब कहाणी!!, असे म्हणायची वेळ महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांनी आणली आहे. 2019 ते 2024 मधल्या सत्ता नाट्याची ही कहाणी आहे. कुणी ही कहाणी साहेबांच्या मुत्सद्देगिरीची कमाल म्हणून रंगवली, तर कुणी तिला खंजीर खुपशी उपमा दिली. पण ही फसवा फसवीची कहाणी आहे हे मात्र निश्चित, आणि ही फसवा फसवी महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याची बिलकुल झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे आणि ती सगळ्या नेत्यांनी मिळून केली आहे!!Pawar and thackeray cheated maharashtra, the full story
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत पत्रकारांची अनौपचारिकपणे बोलताना महाराष्ट्रातल्या दुसऱ्या सत्तांतराची कहाणी सांगितली. आपण अजित पवार म्हणून नव्हे, तर ए. ए. पवार म्हणून विमान प्रवास करत होतो. अमित शाह यांच्याबरोबर 10 मीटिंग्ज झाल्या. त्यात प्रत्येक टप्प्यावर काय काय करायचे ते ठरले, वगैरे माहिती त्यांनी दिली. पण त्याच वेळी आपण वेश बदलून वेगवेगळ्या मीटिंग्जला जात होतो. कधी खोट्या मिशा लावून, तर मास्क आणि टोपी घालून जावे लागत होते, असे अजितदादा म्हणाले.
अजितदादांनी सांगितलेल्या कहाणीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. संजय राऊत यांनी आपल्या नाट्यमय शैलीत महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना “नट” म्हणून घेतले. महाराष्ट्रात मोठे नाट्य परंपरा आहे. बालगंधर्वांपासून श्रीराम लागूंपर्यंत आणि आता प्रशांत दामलेंपर्यंत मोठमोठे नट महाराष्ट्रात झाले, पण त्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मागे टाकले, असा टोमणा संजय राऊत यांनी सगळ्यांनाच मारला.
महाराष्ट्रातल्या दुसऱ्या सत्तांतरात देवेंद्र फडणवीस कोणाला ओळखू येऊ नये म्हणून हुडी घालून कसे घराबाहेर पडायचे, याची कहाणी अमृता फडणवीस यांनी सांगितली होती. तेव्हा देखील महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले होते. त्यावर संजय राऊत यांनी अहमद पटेल यांना भेटायला जाताना एकनाथ शिंदे वेश बदलून जात होते, असा दावा केला. इतकेच नाही, तर त्याची कहाणी पृथ्वीराज चव्हाण सांगू शकतील, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
पण एकूणच ही सगळी कहाणी मूळात फसवाफसवीची आहे आणि ही फसवा फसवी केवळ नेत्यांनी एकमेकांची केली असे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक या नेत्यांनी केली. कारण 2019 चा जनतेने दिलेला कौल सरळपणे स्वीकारून, जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, तर असल्या हुड्या घालून किंवा खोट्या मिशा लावून, वेश बदलून कुठे कुणाला जावेच लागले नसते. पण जे उघडपणे प्रचारामध्ये त्यावेळी बोलले गेले, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, ते छुप्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मान्य झाले नाही. मातोश्रीतल्या बाळासाहेबांच्या खोलीत म्हणे अमित शाह यांनी त्यांना समसमान सत्ता वाटपाचे आश्वासन दिले होते. ते अमित शहा यांनी पाळले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगून ऐन वेळेला पलटी मारली आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकावली. त्यांना नेहमीप्रमाणे “खंजीर खुपशी” राजकारण करून शरद पवारांनी साथ दिली. किंबहुना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पवारांनीच फुलवली हा या कहाणीतला ट्विस्ट होता.
पण पवारांची कुठलीही खेळी ही “साहेबांची मुत्सद्देगिरी” असल्याने मराठी माध्यमांनी साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल धुडकावला तरी त्यांनी घडवलेल्या सत्तांतराला अधिमान्यता देऊन टाकली. “साहेबांनी किती भारी डाव टाकला”, याची वर्णने करण्यात अडीच वर्षे खर्च केली. पण साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन जनमताचा कौल धडकावून लोकशाहीचा गळा घोटला, हे मात्र “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांना दिसले नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाची खरी गोची आणि गोम इथे आहे.
नाटक का करावे लागले??
आणि इथून पुढेच कुणाची हुडी, तर कुणाचा मास्क आणि खोटी मिशी महाराष्ट्राच्या फसवा फसवीची अजब कहाणी!!, सुरू झाली. एकनाथ शिंदेंचे बंड झाले. त्याला दिल्लीतून मोदी + शाह यांनी खतपाणी घातले. फडणवीसांनी वेगवेगळ्या चाली खेळल्या आणि त्या खेळताना त्यांना हुडी घालावी लागली. नंतरच्या 11 महिन्यांनी अजित पवारांना मास्क घालून खोटी मिशी लावावी लागली. कारण सरळ पण कुणाकडेच नेतृत्व द्यायचे नाही ही साहेबांची खासियत किंवा साहेबांचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा होता. त्याला दुसरा पर्याय नव्हता म्हणून सगळ्यांना सगळी नाटके करावी लागली. त्यात बालगंधर्वांपासून श्रीराम लागूंपर्यंत आणि अगदी आत्ताच्या प्रशांत दामलेंपर्यंत अभिनयात सगळ्यांना “मागे” टाकावे लागले. कारण महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाली होती. ती फसवणूक थांबाविणे सहज सोपे नव्हते, मग नाटकांशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण आधीच्या पवार + ठाकरेंच्या खंजीर खुपशी नाटक नाटकावर पडदा टाकायचा, तर नवीन नाटक रंगमंचावर आणणे भाग होते, ते शिंदे + फडणवीस + अजितदादा त्रयीले आणले, ही महाराष्ट्राच्या फसवा फसवीची अजब, पण खरी कहाणी आहे!!
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App