होय, काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष…!!; पण हे पक्षाच्या नेत्यांना सांगावे का लागते…??


संसदेचे अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यासाठी काँग्रेसची रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १० जनपथ येथे काल संसदेच्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीचा भर काँग्रेस हाच देशातला मुख्य विरोधी पक्ष आहे हे ठसविण्यावर होता. काँग्रेसचे नेते मल्लीकर्जून खर्गे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीच्या आधारेच वरील विधान केले आहे. देशात काँग्रेस हाच मुख्य राष्ट्रीय पक्ष आहे आणि सध्या तो मुख्य विरोधी पक्ष आहे, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.Congress is the main opposition party … !!; But why do you have to tell this to the party leaders

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीची माहिती काल सायंकाळी त्यांनी पत्रकारांना दिली आहे.पण या बैठकीचा भरच जर काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष आहे हे ठसविण्यावर असेल?, तर मूळात हा प्रश्न उद्भवतो की काँग्रेस नेत्यांना हे जाहीरपणे सांगावे का लागत आहे…?? वास्तविक पाहता काँग्रेसचे लोकसभेत 54 खासदार आहेत. राज्यसभेतही तो भाजप खालोखाल असा मोठा पक्ष आहे. संख्याबळाच्या दृष्टीने पाहिले तर काँग्रेस हाच खरा मोठा विरोधी पक्ष आहे.



पण तरीही काँग्रेस नेत्यांना आपणच मुख्य विरोधी पक्ष आहोत, हे सांगावे लागते यातच खरी “राजकीय मेख” दडलेली आहे. याचा अर्थ सरळ आहे, की काँग्रेसला कोणी मुख्य पक्ष मानायला आता तयार नाही. किंबहुना अन्य भाजपविरोधी पक्ष आपली वाटचाल काँग्रेसला वगळून करू लागल्याचे स्पष्ट आहे.

इतकेच नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उघडपणे दोन महत्त्वाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यातला पहिला प्रयत्न स्वतः पुढाकार घेऊन सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्याचा आहे, तर दुसरा प्रयत्न भाजपवर तोंडी फैरी झाडत असताना प्रत्यक्ष राजकीय कृतीतून मात्र त्या काँग्रेस पक्ष पोखरत आहेत. ममतांची गेल्या सहा महिन्यांमधली राजकीय वाटचाल बघितली तर त्यांना आपला तृणमूल काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेस पक्षाला राजकीयदृष्ट्या पर्याय ठरेल अशा पद्धतीचा बांधायचा आहे.

काँग्रेस पक्ष फोडूनच स्वत:चा तृणमूल काँग्रेस परिवार त्यांना वाढवायचा आहे. यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही किंवा फार मोठी शोध पत्रकारिता पण नाही. तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर वारंवार हे लिहिले गेले आहे की तृणमूल काँग्रेसचा परिवार वाढतो आहे!!

आत्तापर्यंत “परिवार” हा शब्द संघ परिवार किंवा काँग्रेस मधला गांधी परिवार या दोन राजकीय घटकांशी निगडित होता. आता मात्र तृणमूल काँग्रेस स्वत:हून स्वतःला “परिवार” असे संबोधताना दिसत आहे आणि काँग्रेस पक्ष फोडून आपला तृणमूल काँग्रेस परिवार वाढवण्याचा त्यांचा मनसूबा दिसतो आहे.

अशा स्थितीत काँग्रेसच्या दृष्टीने जर विरोधी पक्षांमधूनच आपल्या अस्तित्वाला नख लावणारा पक्ष उदयाला येत असेल तर काँग्रेस नेत्यांनी उघडपणे आपणच देशातला मोठा राष्ट्रीय पक्ष आहोत आणि सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहोत हे सांगण्यात राजकीय दृष्ट्या काहीच गैर नाही. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळेच काँग्रेसची कमजोरी देखील स्पष्ट दिसते. ती म्हणजे काँग्रेसचे नेते आता एवढे प्रभावी उरलेले नाहीत की ते अन्य विरोधी पक्षांवर आपला ठसा उमटवू शकतील किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकीय प्रबळ नेत्यांना अटकाव करू शकतील किंवा काँग्रेस पक्ष निदान फुटण्यापासून तरी वाचवू शकतील!!

 राहुल गांधी का गैरहजर?

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या आजच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोन महत्त्वाचे नेते हजर नव्हते. प्रियांका गांधी या संसदेच्या सदस्य नाहीत. पण राहुल गांधी हे वायनाड मतदार संघाचे खासदार आहेत. ते लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांच्यामागे दुसऱ्या रांगेत बसतात. मग त्यांना काँग्रेसची संसदेत रणनीती ठरविण्यासाठी निमंत्रण दिले नव्हते? का की ते स्वतःहून या बैठकीला हजर राहिले नव्हते?

हे प्रश्न नैसर्गिकपणे उपस्थित होतात कारण काँग्रेसची रणनीती ही राहुल गांधींच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय निश्चितच होऊ शकत नाही. एवढा त्यांचा काँग्रेस पक्षावर प्रभाव आहे. मग त्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी अशी कोणती रणनीती ठरविली की जी सर्व विरोधी पक्षांची एकजूट घडवू शकेल?, या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. हा प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही.

पण काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष आहे आणि सर्व विरोधकांची एकजूट घडविण्याचे प्रयत्न करणार आहे, हे काँग्रेस नेत्यांना सांगावे लागते, याचा संबंध कुठेतरी राहुल गांधी यांच्या उपस्थिती आणि अनुपस्थिती याच्याशी देखील संबंधित आहे!!

ज्येष्ठत्व आणि नेतृत्व भेद

सर्व विरोधी पक्षांना सोनिया गांधी यांचे ज्येष्ठत्व मान्य आहे, पण नेतृत्व मान्य नाही. राहुल गांधींच्या बाबतीत असे नाही. त्यांच्याकडे ज्येष्ठत्वही नाही आणि त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षांनी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसला फुटीपासून ते वाचवू शकत नाहीत. त्यामुळे सध्याचे राजकीय अस्तित्व मोठ्या आवाजात ठळक पणे सांगण्याची वेळ काँग्रेस नेत्यांवर आली आहे.
ही खरी “काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष आहे”, हे सांगण्यातली “राजकीय मेख” आहे…!!

Congress is the main opposition party … !!; But why do you have to tell this to the party leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात