विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 26) उशीरा जाहीर केले.
अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होईल या भीतीने नागरिक दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी करु लागल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दिसत आहे. भाजीपाला खरेदीसाठी लोक रांगा लावू लागले आहेत. त्यामुळे देश लॉकडाऊन करण्याच्या मुळ हेतूवरच पाणी ओतले जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र खरेदीसाठी बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे या हेतूला तडा जाऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात या विषयीची चर्चा झाली. लॉक डाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदीची खात्री त्यांना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले. या निर्णयामुळे अनावश्यक भाववाढीलाही आळा बसण्याची चिन्हे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App