असहाय्य संतांच्या पालघरमधील माॅब लिचिंगने देशभर संतापाची लाट; उद्धव सरकार व बघे पोलिसांवर टीकेची झोड


पोलिसांच्या हवाल्याने  स्थानिक माध्यमांनी  ‘जमावाच्या मारहाणीत चोरांचा मृत्यू’, अशी त्रोटक बातमी देऊन या घटनेवर जवळपास पडदाच टाकला होता. पण या माॅब लिचिंगचे हदय कवटाळून टाकणारे व्हिडीओज रविवारी व्हायरल झाले…भीतीने काळंवडलेले ते संत, पोलिसांचा हात धरून दयेची याचना करणारे त्यांचे भेदरलेले चेहरे,  त्या संतांना निष्ठूरपणे झूंडीच्या हवाली करणारे बघे पोलिस आणि शेवटी त्यांना काठीने बेदम मारहाण करून त्यांचा बळी घेणारी झुंड…अमानुषतेचे, क्रौर्याचे दर्शन घडविणारया व्हिडीओंनी देशभरच संतापाची एकच लाट उसळली. तोपर्यंत सरकार तोंडात गुळण्या घेऊन गप्पगार बसले होते…


विशेष प्रतिनिधी

मुंबई :   पालघरजवळ झुंडशाहीने असहाय्य संतांच्या केलेल्या हत्येने (माॅब लिचिंग) देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांची फौज तिथे असताना आणि ते संत दयेची भीक मागत असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाल्याने तर संतापांमध्ये भरच पडली.

गुरूवारी रात्री पालघरमधील गडचिंचले गावांमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सुरतमध्ये एका परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या या संतांची गाडी गडचिंचले येथे थांबविली आणि दोन संत व चालकाला गाडीतून खाली खेचले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची फौज तिथे पोहोचली, पण झुंड हाताबाहेर गेली होती. पोलिसांच्या समोरच त्यांना बेदम झोडपण्यास सुरूवात केली. त्यामधील कल्पवृक्ष गिरी हे सत्तर वर्षीय संत तर अतिशय भेदरलेले होते. दयेची याचना झुंडींकडे करीत होते, झुंडीपासून वाचण्यासाठी पोलिसांचा हात धरत होते. पण झुंड ऐकण्यास तयार नव्हती. जेव्हा झंुड नियंत्रणाबाहेर गेली, तेव्हा पोलिसांनी या संतांचा हात सोडला आणि ते बाजूला उभे राहिले, बघे बनले. अगदी त्यांच्या समक्ष मरेपर्यंत मारहाण केली गेली. त्यामध्ये कल्पवृक्षगिरी महाराज, चिकने महाराज (४०) आणि चालक नीलेश तेलगडे याचा एका अमानवी हिंसाचारामध्ये बळी गेला.

कशामुळे माॅब लिचिंगची ही घटना घडली, याचे पोलिसांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. गडचिंचले परिसरामध्ये मुलांना पळविणारया चोरांच्या टोळ्या घुसल्याचा अफवा पसरल्या होत्या आणि त्या संशयातून झुंडीने या तिघांचा क्रूरपणे बळी घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. त्याच्या आधारावर स्थानिक माध्यमांनी, “जमावाच्या मारहाणीत चोरांचा मृत्यू” अशी त्रोटक बातमी दिली आणि या घटनेवर जवळपास पडदाच पाडला. पण या माॅब लिचिंगचे दर्दनाक व्हिडीओ रविवारी व्हायरल झाले… भीतीने काळंवडलेले त्या असहाय्य संतांचे चेहरे, पोलिसांचा हात धरून दयेची याचना करणारे त्यांचे भेदरलेले चेहरे,  त्या संतांना झंुडीच्या हवाली करणारे बघे पोलिस आणि सगळयात शेवटी त्यांना काठीने बेदम मारहाण करून त्यांचा बळी घेणारी झुंड…या व्हिडीओंनी देशभरच संतापाची एकच लाट उसळली. तोपर्यंत या घटनेची अमानुषता कोणालाच माहिती नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा गृहमंत्री अनिल देशमुख तर सोडाच, पोलिसांनीही धक्कादायक या घटनेची साधी माहितीही नीट दिली नव्हती! पालघर पोलिसांच्या ट्विटरवर त्याचा मागमूसही नव्हता. कोणाकडूनही चकार शब्द नव्हता. देशभरातील माॅब लिचिंगच्या घटनेवर रान पेटविणारे सेलिब्रेटीसुद्धा तोंडात गुळण्या घेऊन बसले होते.  

_________________________________________________________________________________________________________________

अखेर निलंबनाची कारवाई…

या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

__________________________________________________________________________________________________________________

पण वणव्यासारख्या पसरलेल्या संतापाची तीव्रता लक्षात घेऊन आतापर्यंत गप्प बसलेले उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मौन सोडले. “या हल्लेखोरांना सोडणार नाही. आतापर्यंत १११ जणांना अटक केलेली आहे,” अशा स्वरूपाचे ट्विट त्यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांना “हल्ला” हा शब्द वापरला, “माॅब लिचिंग” नव्हे! या अमानुष हत्येची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न असावा. त्यानंतर मग पालघर पोलिसांनी १११ जणांना अटक केल्याचे ट्विटरवर लिहिले.


बघे पोलिसांचा पोलिसदलाला काळीमा, मात्र मुख्यमंत्र्यांकडून ‘ब्र’ ही नाही..!

या अमानुष गुन्हामध्ये सर्वांत दुर्दैवी व धक्कादायक बाब होती, ती म्हणजे पालघर पोलिसांचे वर्तन. त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते, पण ते बघेच राहिले. सत्तर वर्षाचे कल्पवृक्षगिरी संत हे जीव वाचविण्यासाठी अक्षरशः दयेची याचना करीत होते; पण त्या पोलिसांनी त्यांना अक्षरश झुंडींच्या ताब्यातच दिले. त्यांच्या समोर या तिघांना अतिशय क्रूरपणे मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी काहीही केले नाही. ते शेवटपर्यंत बघेच राहिले. पोलिसांची ही कृती पोलिसदलाला काळीमा फासणारी होती. विशेष म्हणजे, पोलिसांनी १११ जणांना अटक केली; पण कर्तव्य पालनात कसूर केलेल्या पोलिसांवर काहीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्रीसुद्धा कारवाई करण्याबाबत काहाही बोलले नाहीत!


LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात