वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रासायनिक शेतीमुळे उपजाऊ जमिनीचे प्रचंड मोठे नुकसान आधीच झाले आहे. आता आपल्या शेतीला रासायनिक प्रयोगशाळेतून बाजूला काढून पुन्हा एकदा नैसर्गिक प्रयोगशाळेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वळवले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. right time to turn back to natural farming, PM Modi tells small land holder farmers
नैसर्गिक शेती संदर्भात गुजरातच्या आणंदमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्याचवेळी देशभर विविध ठिकाणी यासंदर्भातले ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक शेतीचे लाभ आणि रासायनिक शेतीची हानी याविषयी सविस्तर विवेचन केले. शेतकऱ्यांनी आपल्याला लागलेल्या जुन्या खोडी आणि सवयी बदलल्या पाहिजेत. शेतामध्ये पीक कापणी नंतर उरणारे धसकट जाळण्याची पद्धत आहे. ती पद्धत बंद केली पाहिजे. कारण शेतीतले जाणकार असे सांगतात की जमीन तापल्यामुळे शेतीयोग्य मातीची प्रचंड हानी होते. मातीची उपज क्षमता हळूहळू नष्ट होते. परंतु, आता दुर्दैवाने कापणीनंतर धसकटे जाळण्याची वाईट प्रथाच पडली आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक ही प्रथा मोडीत काढली पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले. शेतीला रसायनमुक्त करून निसर्गयुक्त केल्याने उत्पादन वाढ आणि निरोगी आयुष्य मिळेल. शेतकऱ्याचे यासाठी योगदान महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मागणी आहे आणि ही मागणी भविष्यकाळात वाढणार आहे याकडे देखील पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.
उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये ना शेत जमिनीचे आरोग्य जोपासले गेले, ना देशातील नागरिकांचे. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे नैसर्गिक शेती करण्याची. आता पर्यंत या पर्यांयाचा अवलंब कोणी केलेला नाही. नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. गरज आहे ती शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची. रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढच होत नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे. रासायनिक खतांचा असाच वापर होत राहिला तर शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. आता हीच योग्य वेळ आहे आपल्या मूळ नैसर्गिक शेतीकडे मार्गक्रमण करण्याची असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नैसर्गिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. हा नैसर्गिक शेतीचा बदल काही दिवसांमध्ये होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना भीती आहे की, यामधून उत्पादनात घट होईल याची. मात्र, अल्पभुधारक शेतकऱ्यांनी लागलीच सर्वच क्षेत्रावर हा प्रयोग न करता टप्प्याटप्प्याने हा बदल करणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर आणि कीडनाशकांवर अधिकचा खर्चही करावा लागणार नाही. मात्र, हा बदल स्वीकारणे ही आता काळाची गरज आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी बदल स्वीकारला आहे, असे त्यांनी सांगितले.
कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना शेतकऱ्यांनी याचा अवलंब करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App