आगामी लोकसभा निवडणुकीला आठ महिने बाकी राहिले असताना विविध सर्वेक्षणे प्रसिद्ध होत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणातून भाजप आघाडीच कमी – जास्त जागा मिळवून सत्तेवर येणार हे कमी – अधिक फरकाने जवळपास सगळ्यांनी दाखविले आहे. सर्व राजकीय पक्षांची अंतर्गत सर्वेक्षणे देखील चालू आहेत. Congress internal survey shows 45 seats in maharashtra in loksabha elections, but its very much tall claim
काँग्रेसच्या सर्वेक्षणात 45 जागा
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात केलेल्या अंतर्गत सर्व्हेची आकडेवारी स्वतः जाहीर करून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 48 पैकी तब्बल 45 जागा दिल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना या सर्वेक्षणाची माहिती दिली.
महाराष्ट्र शिंदे – फडणवीस सरकार येऊन 11 महिने उलटले. त्यानंतर त्यांच्यासमवेत अजित पवार आले. पण या तिघांची महायुती होऊन देखील महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. जनता महायुतीला अजिबात कौल देणार नाही. उलट शरद पवार – उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीलाच जनता कौल देईल, असा दावा नाना पटोले यांनी करत काँग्रेसनेच केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. आता असा हवाला द्यायला काहीही हरकत असण्याचे कारण नाही. पण पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नाना पटोले यांनी जाहीर रित्या मांडल्याने काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
ते असे :
मूळात जे सर्व राजकीय पक्ष विविध जागांसाठी अंतर्गत सर्वेक्षणे करतात, ते असे खूप आधी जाहीररीत्या बोलून दाखवतात का??
मूळात ती सर्वेक्षणे विशिष्ट राजकीय चाचपणीसाठी असतात. पक्षाच्या अंतर्गत अभ्यासासाठी, उमेदवार निश्चितीसाठी, पक्षाचा निवडणूक अजेंडा आणि रणनीती ठरविण्यासाठी असतात. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सहसा कोणताच पक्ष बाहेर जाहीर करीत नाही.
मात्र त्या सर्वेक्षणातून आपल्याला समजलेले पक्षाचे कच्चे दुवे, नेते आणि उमेदवारांच्या उणीवा, प्रचाराचे मुद्दे यावर पक्षांतर्गत मंथन करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पक्षाचे वरिष्ठ नेते करतात.
कोणतीही पक्षांतर्गत सर्वेक्षणे ही पक्षासाठी गाईडलाईन मानली जाते आणि ही गाईडलाईन कोणी जाहीर करत नसते, तर त्याऐवजी त्या सर्वेक्षणाच्या आधारे निवडणुकीची रणनीती ठरविली जाते. त्यासाठी सर्व पक्ष वेगवेगळ्या एजन्सी नेमतात.
काँग्रेसने देखील महाराष्ट्रातले सर्वेक्षण करताना अशीच एजन्सी नेमूनच ते काम केले आहे. पण बाकीच्या पक्षांपेक्षा आपला “वेगळेपणा” दाखवताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर करून टाकला आहे आणि इथेच खरी “राजकीय मेख” आहे.
45 जागा कधी कोणाला मिळाल्यात का??
केंद्रात मोदी सरकार महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस आणि त्याला जोडलेले अजित पवार अशा त्रिवेणी सरकारची बलाढ्य ताकद उभी असताना लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा काँग्रेस सह महाविकास आघाडीला मिळतील, असे सांगणे हाच मूळात मोठा “राजकीय विनोद” आहे. काँग्रेसच्या इंदिरा लाटेत आणि पक्ष संघटनेच्या बलाढ्य अवस्थेत देखील कधीही महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभेच्या 45 जागा मिळालेल्या नाहीत. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला 15 वर्षांच्या सत्ता काळात देखील त्याच्या जवळपासची संख्या देखील कधीही गाठता आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तुल्यबळ जागा मिळतील. त्या 25 ते 30 अगदी 35 पर्यंत असतील, असे नानांनी सांगितले असते, तरी त्याकडे थोडेफार तरी गांभीर्याने पाहावे लागले असते. पण काँग्रेसचा दावा एकदम 45 जागांचा आहे, हाच नेमका “राजकीय विनोद” वाटतो आहे.
कारण शिंदे – फडणवीस सरकारला अजित पवारांची राजकीय स्टेपनी जोडल्यानंतर देखील महायुतीने आपल्या जागांचे टार्गेट 45 ठेवले आहे. याचा अर्थ ते किमान “पॉलिटिकल प्रॅक्टिकल” विचार करतात, असे तरी मानावे लागेल.
*पण काँग्रेस नेत्यांनी मात्र हे भलतेच काहीतरी केले आहे. पक्षांतर केलेल्या सर्वेक्षणाचा कथित निष्कर्ष जाहीर करून महाविकास आघाडीला 45 जागा देणे, म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहून आपण किती सुंदर दिसतो ना, असे स्वगत म्हणण्यासारखे आहे!! वास्तविक आपण सुंदर दिसत नसतो. आरशाला मेकअप केल्यामुळे तो सुंदर भासत असतो. पण आपणच सुंदर दिसत असल्याची खुशीची गाजरे मनातल्या मनात खात आपण त्याच्यासमोर उभे राहिलेले असतो…!! पण त्यामुळे आपण सुंदर नसल्याची वस्तुस्थिती बदलत नाही!!, असे म्हणावे लागेल.
काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे देखील असेच आहे. भले काँग्रेसचा हुरूप वाढविणारे निष्कर्ष त्यातून आलेही असतील, पण म्हणून महाविकास आघाडीला एकदम 45 जागा मिळणार हे आठ महिने आधी सांगून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी अहंकार निर्माण होणार नाही का?? कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येणार नाही का?? एवढा साधा विचारही काँग्रेस सारख्या सर्वात बुजुर्ग पक्षाच्या नेत्यांना करता येऊ नये, याचे आश्चर्य वाटते.
पण काँग्रेसची केंद्रातली आणि महाराष्ट्रातील सध्याची अवस्था कोण कोणाला सांगणार?? आणि कोण कोणाचे ऐकणार??, अशी असल्याने या सर्वेक्षणाबद्दल अधिक काही न बोललेलेच बरे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App