विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचा आम आदमी पार्टीवर राग आहे. समाजवादी पक्षाचा बहुजन समाज पक्षावर आक्षेप आहे आणि तरीही विरोधकांना 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी ऐक्याची अपेक्षा आहे. P. Chidambaram targets AAP and Akhilesh Yadav targets BSP, But still opposition parties feel unity
गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीवर प्रचंड आगपाखड केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आम आदमी पार्टीने गुजरात मध्ये काँग्रेसचे प्रचंड नुकसान केल्याचा आरोप आणि दावा केला आहे. त्याच वेळी त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी ऐक्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. गुजरात हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिका या निवडणुकांचे सविस्तर विश्लेषणही चिदंबरम यांनी या मुलाखतीत केले आहे.
तिन्ही निवडणुकांच्या निकालाचा बारकाईने विचार केला तर काँग्रेसवर आजही जनतेचा विश्वास असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. परंतु, आम आदमी पार्टीने भाजपचा हस्तक बनून काँग्रेसची मते कापण्याचे काम केल्याचे लक्षात येते. आम आदमी पार्टीला स्वतःचे कोणतेही तत्वज्ञान नाही. फक्त दिल्लीत त्यांना एकदा यश मिळाले आणि त्या आधारावर त्यांनी भाजपच्या पैशाच्या बळावर इतर राज्यांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. पंजाब मध्ये त्यांना काँग्रेसची मते कापूनच यश मिळाले. दिल्लीमध्ये काँग्रेसच्याच मतांवर आम आदमी पार्टीने डल्ला मारला. गुजरात मध्ये तर केवळ आम आदमी पार्टीमुळेच धर्मनिरपेक्ष मते विभागली. त्यांचा दारुण पराभव झाला पण त्यांनी काँग्रेसला फार मोठे नुकसान पोहोचवले, असे एकापाठोपाठ एक आरोप चिदंबरम यांनी आम आदमी पार्टीवर केले आहेत. एकीकडे आरोपांच्या या फेरी झाडताना दुसरीकडे चिदंबरम यांनी त्याच मुलाखतीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या एकजुटीची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
या संदर्भात मूळ प्रश्न हा आहे, की प्रतिस्पर्धी भाजपवर तोफा डागण्याऐवजी जर दुसऱ्या प्रतिस्पर्धी पक्षावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तोफा डागल्या तर ते छोटे – मोठे पक्ष काँग्रेसला कसे काय मदत करू शकतील? किंवा मदत करायला पुढे तरी का येतील?, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या नेत्यांना अद्याप त्कोणी विचारले नाही. त्यामुळे त्यांनी उत्तर देण्याचा प्रश्न उद्भवला नाही.
पण जे काँग्रेस नेत्यांचे तेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे झाले आहे. उत्तर प्रदेशात मैनपुरी लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर समाजवादी पक्ष जोमात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रोखण्याची भाषा समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीतला भाजपच्या यशाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेशाने सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला भरभरून यशाचे दान टाकले आहे. पण यावेळी समाजवादी पक्ष भाजपला उत्तर प्रदेशातच रोखून दाखवेल मग भले बहुजन समाज पक्ष भाजपच्या कलाने वागत असला तरी समाजवादी पक्षाच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालणार नाही, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. हा दावा करताना अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना डिवचले आहे.
वास्तविक बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील मतांच्या फाटाफुटीमुळे भाजपला उत्तर प्रदेशात अनेक जागांवर लाभ झाल्याचे दिसले आहे तरी देखील अखिलेश यादव हे मायावतींना आजही डिवचायला कमी करत नाहीत. वर ते भाजपला रोखण्याचीही भाषा करतात यातली राजकीय विसंगती अखिलेश यादव लक्षात घेत नाही आणि काँग्रेस पक्षही लक्षात घेत नाही.
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोन्ही प्रबळ विरोधी पक्षांचे नेते आपल्या संभाव्य मित्र पक्षांवर तीव्र आक्षेप नोंदवतात आणि त्यांच्याकडूनच विरोधी ऐक्यासाठी पुन्हा सहकार्याची अपेक्षा करतात ही यातली राजकीय विसंगती आहे आणि ही विसंगती कोण दूर करणार?, हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीतला यक्षप्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App