नाशिक : पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सगळा देश पाकिस्तानच्या विरोधात एकवटला भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ले करून तिथली नऊ दहशतवादी केंद्रे नष्ट करून टाकली. पाकिस्तानच्या हवाई दलाला पांगळे केले. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मधल्या जनतेने देखील भारताला साथ देत दहशतवाद्यांचा तीव्र निषेध केला. राज्यातल्या जनतेने ठिक ठिकाणी मोठी निदर्शने केली. फारूक अब्दुल्लांनी पहलगाम मध्ये जाऊन तिथे पर्यटकांना येण्याचे आवाहन केले. Omar Abdullah
पण जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज त्यांचे “खायचे वेगळे दात” दाखवलेच. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची सुरक्षा व्यवस्था ही निवडून आलेल्या सरकारची नाही, तर तिघांची आहे. कारण जम्मू कश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार, उपराज्यपाल आणि राज्य सरकार यांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे वक्तव्य उमर अब्दुल्ला यांनी केले. या वक्तव्यातून त्यांनी राज्य सरकारची जबाबदारी झटकायचा प्रयत्न केला.
– तीन पिढ्यांची डबल ढोलकी
अब्दुल्ला कुटुंबाने नेहमीच असे “डबल ढोलकी” राजकारण केले. उमर अब्दुल्लांचे आजोबा शेख अब्दुल्ला यांनी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविरुद्ध गद्दारी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामील होण्यापेक्षा जम्मू-काश्मीरने स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड होती. परंतु सुरुवातीला पंडित नेहरूंनी आणि नंतर इंदिरा गांधींनी शेख अब्दुल्ला यांना वेसण घातली म्हणून ते सरळ झाले. पण त्यांनी कधीच 100% भारताच्या बाजूने भूमिका घेतली नाही. जम्मू काश्मीर मधल्या फुटीरतावादी नेत्यांना त्यांनी कायम पाठीशी घातले. त्यांचाच वारसा त्यांचा मुलगा फारूक अब्दुल्ला आणि नातू उमर अब्दुल्ला यांनी चालविला.
त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे अनेक वेळा मुख्यमंत्रीपद भोगले. केंद्र सरकारकडून सगळे राजकीय आणि सामाजिक फायदे उपटले. विविध प्रकारची अनुदाने लाटली. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील भोगले, पण फारूक अब्दुल्लांनी देखील भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाला 100 % टक्के पाठिंबा दिला नाही. मोदी सरकारने 370 कलम रद्द केले, तरी तो निर्णय फारूक अब्दुल्लांनी मनापासून मान्य केला नाही. उलट जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम पुन्हा बहाल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा गर्जना त्यांनी केल्या. पाकिस्तानने दहशतवाद थांबवल्याशिवाय त्या देशाशी चर्चा करायची नाही ही मोदी सरकारने घेतलेली भूमिका फारूक अब्दुल्ला यांनी मान्य केली नाही. उलट ते भारत आणि पाकिस्तान यांच्या चर्चा व्हावी, अशी टिमकी नेहमी वाजवत बसले.
फारूक अब्दुल्लांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांनी देखील जम्मू-काश्मीरचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भोगायला सुरुवात केली. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारशी संवाद साधायची भूमिका घेतली. केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कारवाईला सुरुवातीला पाठिंबा दिला. पण ज्यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आला त्यावेळी मात्र त्यांनी राज्य सरकारची जबाबदारी झटकून टाकायचा प्रयत्न केला. पर्यटकांची सुरक्षा व्यवस्था ही राज्य सरकारची जबाबदारी नाही ती राज्यपालांची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.
पहलगामच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या जम्मू-काश्मीरच्या जनतेने एकत्र येऊन त्या हल्ल्याचा निषेध केला त्यामुळे कुठल्या एका पक्षाने निषेध करायचे क्रेडिट घेऊ नये असा टोमणा त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स सोडून बाकीच्या पक्षांना मारला. पण पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावरून झटकून टाकत उमर अब्दुल्लांनी अखेर आपले खायचे दात दाखवायचे, ते दाखवलेच!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App