विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने टीकास्त्र सोडले, पण त्यानंतर आज लगेच सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण फसल्यावर सुप्रिया सुळे यांनी नवा “डाव” टाकला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक, पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्य यावर बोलल्या. त्या म्हणाल्या, मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकावर विश्वास दाखवला. शरद पवार बिनविरोध निवडून आले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा वारसा आहे. विरोधी पक्ष आपला शत्रू नसतो. मतभेद असले पाहिजेत, पण मनभेद असू नयेत. राज्यसभा निवडणुकीवेळी सर्वच पक्षांनी समंजसपणा दाखवला. सन्मानाने एकमेकाशी बोलून निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका लोकशाही पद्धतीची आहे. त्यात गैर वाटत नाही.
– मोकळा श्वास काँग्रेसमुळेच
काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु आहे म्हणून त्यांनी उमेदवार दिला. किंमत चुकवावी लागेल, या पार्थ पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. त्या म्हणाल्या, एकतर काँग्रेस पक्ष हा एक भारतातला मोठा पक्ष आहे. कुठलाही राजकीय पक्ष हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल. आपण लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत. तुमच्या जन्माआधीची गोष्ट सांगते, आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष जवळून पाहिला आहे. काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो. दादा असतील, पवारसाहेब आम्ही काँग्रेसच्या विचाराच्या तालमीत लहानाचे मोठे झालो. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. आज आपण मोकळा श्वास घेतोय. यामागे काँग्रेस आहे. हे कोणी विसरु शकत नाही!!
– काँग्रेसचे मोठे योगदान
काँग्रेसचं योगदान मोठं आहे. मनमोहन सिंह, नरसिंह राव यांनी मोठे आर्थिक धोरण बदलाचे निर्णय केले. चले जावचा नारा याच काँग्रेस पक्षाने दिला. काँग्रेस पक्षाचं योगदान नाकारुन चालणार नाही. पण लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
– पार्थ चुकला का नाही, त्यांनाच विचारा…
पार्थ पवार चुकले नाहीत का? त्यांच्या परिपक्वतेबद्दलच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. ते त्यांच्या खासदाराचं, त्यांच्या पक्षाचं मत आहे. तुम्ही अजित पवार गटाला विचारलं पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App