विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा आधीच दिसून येत असताना आज तो अधिक ठळक बनला आहे. कारण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नवा बॉस एक भारतीय बनला आहे. अनेक दिवसांच्या अटकळीनंतर अखेर अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष असणार आहेत. जय शाह हे पाचवे भारतीय आहेत, जे ICC चे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. Jay Shah elected unopposed as Independent Chair of ICC
या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी ICC चे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या नंतर जय शाह यांना ही संधी लाभली आहे. ते 35 वर्षांचे असून ICC चे ते सर्वांत तरुण अध्यक्ष असणार आहेत. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत.
बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ते आता विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.
गेली 5 वर्षे बीसीसीआयचे सचिव या नात्याने जय शाह यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. जगातील बहुतांश क्रिकेट बोर्डांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे या पदासाठी जय शाह यांच्यासमोर कोणते आव्हान उभे राहिले नाही. काही दिवसांपूर्वी आयसीसीने सलग दोन वेळा ही जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रेग बार्कले यांचा राजीनामा जाहीर केला होता. आयसीसीच्या घटनेनुसार, सलग 3 टर्म चेअरमन मिळण्याची तरतूद आहे. मात्र न्यूझीलंडच्या बार्कलेने तिसऱ्या टर्मला नकार दिला होता, त्यानंतर जय शाह या पदावर येण्याची चर्चा जोर धरू लागली.
आयसीसीने 27 ऑगस्ट ही अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख निश्चित केली होती. नियमांनुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक होईल, ज्यामध्ये आयसीसीचे 16 सदस्यीय मंडळ मतदान करेल, परंतु जय शाह उमेदवार झाल्यास, हे आधीच स्पष्ट झाले होते की इतर कोणीही उमेदवार नसतील. अशा स्थितीत 27 ऑगस्ट रोजी जय शाह अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आणि त्यानंतर आयसीसीनेही त्यांच्या नावाची घोषणा केली.
अवघ्या 35 वर्षांचे शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असतील. ते 1 डिसेंबरपासून त्यांचा कार्यकाळ स्वीकारतील आणि पुढील 6 वर्षे अध्यक्ष राहू शकतात.
पाकिस्तान टेन्शनमध्ये
जय शाह यांची अध्यक्ष बनल्याने पाकिस्तान टेन्शनमध्ये आला आहे. आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीमध्ये भारतीय बोर्डाच्या वर्चस्वाबद्दल तक्रार करत आहे. विशेषत: पाकिस्तानी क्रिकेटच्या खराब स्थितीसाठी सचिव जय शाह यांना जबाबदार धरत आहे. आता शाह अध्यक्ष बनल्याने पाकिस्तान आणखी चिंतेत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुढील वर्षी पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी.
या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबद्दल आधीच प्रश्न आहेत. त्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता नाही, परंतु पीसीबीला आशा होती की आयसीसी बीसीसीआयला यासाठी दबाव आणेल. आता शाह चेअरमन झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार हा मोठा प्रश्न आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App