विशेष प्रतिनिधी
आजीच्या कर्तृत्वाच्या नातवाकडून अपेक्षा, पण डबल डिजिट असतो का मोठा ट्रिपल डिजिट पेक्षा??, हा प्रश्न राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर निर्माण झाला आहे. कारण राहुल गांधींच्या खासदारकी संदर्भात कायदेशीर लढाई लढण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने राजकीय लढाई अधिक ताकदीने लढायचे ठरवले आहे. कारण त्यामध्ये पक्षाला जास्त लाभ दिसतो आहे. काँग्रेस पक्षाचा तसा जुना अनुभव इंदिरा गांधींच्या काळातला आहे.How can Congressmen expect same accomplishments of indira Gandhi from rahul Gandhi??, though he is grandson of hers!!
ज्यावेळी इंदिरा गांधींची खासदारकी जनता पक्षाच्या राजवटीत रद्द केली होती, त्यावेळी इंदिराजींनी स्वकर्तृत्वाच्या बळावर बाउन्स बॅक करीत भारताची सत्ता पुन्हा एकहाती काबीज केली होती. याची आठवण जुन्या काँग्रेस जणांना होते आहे आणि राहुल गांधींकडून काँग्रेसची तीच अपेक्षा आहे.
पण प्रश्न आणि मुद्दा त्या पुढचा आहे. इंदिराजींना स्वकर्तृत्वावर आणि जनता पक्षाच्या राजकीय चुकांमुळे जे जमले ते राहुलजींना समोर नरेंद्र मोदी असताना जमेल का??, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. शिवाय राहुल गांधींकडून आपल्या आजीच्या कर्तृत्वाच्या अपेक्षा जरी काँग्रेसजनांनी ठेवल्या असतील तरी त्यामध्ये वास्तव अपेक्षा किती आहे आणि उंच आशावाद किती आहे??, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
– खासदारकी रद्द होण्याची कारणे भिन्न
कारण भारतीय राजकारणाची, काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेसच्या समोर असणाऱ्या राजकीय पक्षाची राजकीय परिस्थिती एवढी भिन्न आहे, की त्याची तुलनाच परस्परांशी करणे वास्तवाचे भान सोडण्यासारखे होईल. इंदिराजी आणि राहुलजी यांच्यावरील खासदारकी रद्द होण्याच्या घटनेपलिकडे कोणतेही साम्य नाही. अगदी कारवाईच्या मूलभूत स्वरूपात देखील साम्य नाही. इंदिराजींची खासदारकी रद्द होण्याचे कारण आणि राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याची कारणे पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही.
– चरण सिंगांची उताविळी
इंदिराजींची खासदारकी तत्कालीन गृहमंत्री चरण सिंग यांच्या उताविळीतून रद्द झाली होती. पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मताविरुद्ध जाऊन चरण सिंग यांनी राजकीय इर्षेपोटी इंदिराजींची खासदारकी रद्द करून दाखवली होती आणि या राजकीय इर्षेचाच फायदा इंदिराजींनी आपल्या अंगभूत राजकीय चतुराईच्या बळावर करून घेतला आणि चिकमंगळूर मधून निवडून येऊन इंदिराजींनी खऱ्या अर्थाने “पॉलिटिकल बाउन्स बॅक” केला होता.
– पराभवातही काँग्रेस ट्रिपल डिजिट
मूळात 1977 च्या म्हणजे आणीबाणीच्या निवडणुकीत इंदिराजी पराभूत झाल्या होत्या, हे खरे. पण त्यावेळी देखील पराभूत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 154 होती. म्हणजेच ट्रिपल डिजिट होती. इंदिराजींनी 1980 मध्ये जेव्हा बाउन्स बॅक केले, तेव्हा इंदिराजींच्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या 154 वरून 363 झाली होती. याचा अर्थ इंदिराजींचा काँग्रेस पक्ष विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्ष होताना त्याच्याकडे लोकसभेतले दोन तृतीयांश बहुमत झाले होते. इंदिराजींची काँग्रेस आणि राहुल गांधींची काँग्रेस यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
– डबल डिजिट आणि ट्रिपल डिजिट
सोनियाजींच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए सरकारने लोकसभेतले बहुमत 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये मिळवले असले, तरी काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे बहुमताचा आकडा गाठला आला नव्हता. 2009 मध्ये 204 खासदार संख्या असलेली काँग्रेस 2014 च्या निवडणुकीत 44 वर घसरली होती आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसची खासदार संख्या 10 ने वाढून 44 वरून 54 वर आली होती. आता राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर ही संख्या 53 वर आली आहे. याचा अर्थ सोनियाजी आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली पराभूत काँग्रेस डबल डिजिट मध्ये आली आहे. इंदिराजींची पराभूत काँग्रेस ही 154 म्हणजे ट्रिपल डिजिटमध्ये होती. या वास्तवाचे भान न ठेवता काँग्रेसच्या राहुलजींकडून इंदिराजी सारख्या बाउन्स बॅकची अपेक्षा धरत असतील तर त्याला काय म्हणायचे??, हा प्रश्न आहे.
– विस्कळीत जनता पक्ष आणि घट्ट भाजप
शिवाय इंदिराजींसमोर अंतर्गत संघर्षाने पेटलेला आणि एकमेकांचे पाय ओढणाऱ्या नेत्यांचा जनता पक्ष होता. राहुलजी आणि सोनियाजींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा राजकीय आणि संघटना घट्ट असलेला भारतीय जनता पक्ष आहे. हा यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. इंदिराजींनी विस्कळीत झालेल्या जनता पक्षाची टक्कर घेणे आणि राहुलजींनी घट्ट संघटना असलेल्या भाजपची टक्कर घेणे यात राजकीय गुणात्मक प्रचंड फरक आहे.
– वैयक्तिक राजकीय बुद्धिमत्तेचे काय??
शिवाय वैयक्तिक राजकीय बुद्धिमत्ता आणि चातुर्य हा घटक देखील तितकाच महत्त्वाचा आहे इंदिराजी स्वतः सातत्याने स्वकर्तृत्वावर निवडून येऊन देशाच्या पंतप्रधान बनल्या होत्या काँग्रेस पक्ष एकदा नव्हे तर दोनदा फोडून त्यांनी सत्तेवर आणून दाखवला होता. राहुलजींना काँग्रेस पक्षाचा वारसा सहजतेने मिळाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला दोनदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, ही वस्तुस्थिती विसरता येणार नाही.
– फार तर वरचा स्तर, पण…
राहुलजींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसला त्यांच्या सध्याच्या राजकीय अवस्थेपासून वरचा स्तर गाठण्याची वास्तव अपेक्षा असेल तर ती गैर मानता येणार नाही. किंबहुना तसे होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. पण म्हणून राहुलजींसारख्या इंदिराजींच्या नातवाकडून थेट इंदिराजींची म्हणजेच आजीच्या कर्तृत्वाची अपेक्षा ठेवणे हे राजकीय भान सुटल्याचे लक्षण मानावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App