विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी संपूर्ण देशात लोकसभेच्या 500 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या आणि तब्बल 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे निवडून आणण्याचे नव्हे, तर फक्त लढण्याचे “स्वबळ” आता अवघे 291 जागांवर उरले आहे, याचा अर्थ ते 300 जागांच्या खाली आले आहे!! Congress has reduced to below 300 mark for fighting loksabha elections on it’s own!!
त्यातही फक्त 54 जागांवर काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत विजय मिळवला, तर उरलेल्या 209 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे 261 जागा या काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने “स्वबळा”च्या आहेत, पण उर्वरित 30 जागा काँग्रेससाठी स्पर्धात्मक असल्याचे काँग्रेस नेतेच मानत असून आपण तेथे “स्वबळावर” निवडणूक लढवू शकतो, असा पक्षाच्या नेत्यांना आत्मविश्वास आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 542 पैकी एकूण 375 जागा लढवण्याचे ठरवल्याचे काँग्रेस अंतर्गत सूत्रांनी म्हटले आहे यात मित्रपक्षांची तडजोड अपरिहार्य आहे.
वर उल्लेख केलेली आकडेवारी बारकाईने पाहिली, तर काँग्रेसचे देशावरली राजकीय पकड कशी निसटली आहे, हेच ध्यानात येते.
काँग्रेसचा फार जुना नव्हे, तर 1980 पासूनचा इतिहास जरी तपासला तरी काँग्रेसने कायमच 450 च्या पेक्षा जास्त किंबहुना 500 पेक्षा जास्त जागा नेहमीच स्वबळावर लढविल्या यामध्ये 1980, 1985, 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने 450 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 421 जागा लढवल्या होत्या. 1985 आणि 1989 चा अपवाद वगळता काँग्रेसने क्वचितच प्रादेशिक पक्षांशी आघाडी केल्याची उदाहरणे आहेत.
त्यातही तामिळनाडूत फक्त अण्णाद्रमुक आणि प्रमुख या दोन पक्षांची वेगवेगळ्या वेळी काँग्रेसशी आघाडी काही विशिष्ट वेळेपुरती टिकली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी सुमारे 15 वर्षे टिकली. पण हे दोन अपवाद वगळता बाकी कोणत्याही राज्यात काँग्रेसला फारसे नवे मित्र पक्ष मिळवता आले नाहीत आणि मिळवले तरी जोडता आले नाहीत, हा इतिहास आणि वर्तमान आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन सर्वांत मोठ्या राज्यांमध्ये तर काँग्रेसला समाजवादी पक्ष अथवा बहुजन समाज पक्ष अथवा राष्ट्रीय जनता दल यासारख्या बलाढ्य प्रादेशिक पक्षांची जुळवून घेता आले नाही आणि या दोन्ही राज्यातून काँग्रेसची प्रचंड पीछेहाट झाली, ती अजूनही काँग्रेसला भरून काढता आलेली नाही. उलट काँग्रेसची संघटना या दोन्ही राज्यांमधून कायमची संपुष्टात आल्याचीच चिन्हे प्रत्येक निवडणुकीतून समोर आली. काँग्रेसची स्वबळाची ताकद 291 जागांपर्यंत येऊन ठेपण्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण या दोन राज्यांमध्ये 100 पेक्षा जास्त जागांवर काँग्रेसला आता कोणती संधीच उरलेली नाही.
परंतु 1990 चे 90 च्या दशकांमध्ये राजकारण असे फिरले की उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव मायावती आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचा उदय झाला आणि काँग्रेसचे चक्र फिरले ते कायमचेच!!
इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेस अत्यंत बळकट होती. काँग्रेसचे दोन्ही राज्यांमध्ये मिळून साधारण 90 खासदार सहज निवडून येत असत, त्यामुळे काँग्रेसला संपूर्ण देशात 272 हा बहुमताचा आकडा गाठणे फारसे कधी कठीण गेले नव्हते. 1980 मध्ये 353, 1985 मध्ये 415, 1991 मध्ये 245 आणि 2009 मध्ये 209 जागा मिळवण्याचा हा काँग्रेसचा परफॉर्मन्स चढता नव्हे, तर घसरता राहिला आहे. सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला कधीही बहुमत मिळवता आले नाही
उत्तर प्रदेश आणि बिहार मधून काँग्रेस कायमचे आउट झाली आहे, तर काँग्रेस आता मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगण, आंध्र, काही प्रमाणात महाराष्ट्र याच राज्यांमध्ये संघटनात्मक पातळीवर तुलनेने बळकट उरली आहे. काँग्रेसला याच राज्यांमधून थोडेफार यश मिळण्याची आशा आणि अपेक्षा आहे.
काँग्रेस 2024 च्या निवडणुकीत डबल डिजिट मधून ट्रिपल डिजिटमध्ये जाण्याचे ध्येय ठेवण्यात एवढीच ताकदवान उरली आहे. काँग्रेससाठी 2024 च्या निवडणुकीत 100 च्या वर जागा मिळवणे हे जरी ध्येय साध्य करता आले, तरी काँग्रेससाठी ते स्वतःची प्रतिष्ठा वाचविण्यासारखे ठरणार आहे, असे मत त्यांचेच अतिवरिष्ठ नेते खासगीत व्यक्त करतात. त्यातूनच 2024 चा निकाल “बिटवीन लाईन्स” न वाचता ही समोर येतो!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App