विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवादी राजकारणाचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा जेम्स लेन प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांनी उकळी फोडली. या मुद्द्यावर वार पलटवार झाले. त्यात शरद पवार यांनी दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव घेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर जेम्स लेन इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना ई-मेलद्वारे मुलाखत देऊन काही खुलासे केले आहेत. Raj Thackeray – Sharad Pawar Dispute: James Lane’s revelations about Babasaheb Purandare
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असे पुरंदरे यांनी लिहून ठेवले होते. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती. त्याबद्दल मला अभिमान आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी एक्स्प्रेसला लिहिलेले एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर ही पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपले आरोप कायम ठेवले. मात्र या संदर्भात जेम्स लेन यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.
पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारले असता जेम्स लेन यांनी, तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. पुस्तकात मी काही सांगोपांगी कथा आणि लोक ते काय बोलतात याबद्दल लिहिले होते. काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध समर्थ रामदासांची गुरु या नात्याने जोडतात, तर काहीजण तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असे सांगतात. यापैकी कोणती माहिती योग्य आहे, आणि कोण कुणाचे समर्थन करतो याविषयी मला काही म्हणायचे नाही.
तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असे विचारले असता ते म्हणाले की, मुळात मी पुस्तक लिहिताना कोणताही ऐतिहासिक सत्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी माझे पुस्तक नीट वाचलेले दिसत नाही. त्या पुस्तकात मी फक्त लोक काय बोलतात याविषयी च्या कथा सांगितल्या आहेत. ऐतिहासिक तथ्य नाही. तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केली केली का? आणि केली असेल तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? या प्रश्नावर जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते पुस्तक परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असे विचारले असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.
बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसे पाहता? या प्रश्नावरही जेम्स लेन यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले. पुरंदरे यांचे योगदान मोठेच आहे पण त्यांच्या लिखाणावर आता मात्र 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरून टीका केली जात आहे. जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला. त्याचा हा परिणाम आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. परंतु, त्यांचे चरित्र हा विद्वतचर्चेचा विषय राहिला नाही, तर तो समकालीन राजकीय वादाचे साधन झाले आहे, अशी टिप्पणी देखील जेम्स लेन यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App