विशेष प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाच्या पुड्या सुटल्या असल्या तरी, बाकी कुठल्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा जाहीर केलेल्या नाहीत. याचा अर्थ त्या नेत्यांना पदाच्या महत्त्वाकांक्षाच नाहीत की अन्य काही आहे??, हे पाहणे उचित होईल. Why leaders of other parties except NCP do not declare their ambition for the post of Chief Minister
अजित पवार आणि जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाबाबत सातत्याने बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला पाव शतक होत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाने त्या पक्षाला सातत्याने हुलकावणीच दिली आहे. शरद पवार यांच्यासारखा महाराष्ट्रातला दिग्गज नेता लाभूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद कधीही मिळू शकलेले नाही, हा गेल्या 23 वर्षांचा इतिहास आहे. अशा स्थितीत अजितदादा आणि जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या रिंगमध्ये आपापल्या हॅट टाकून दिल्या आहेत, तरी देखील त्यांना खरंच मुख्यमंत्रीपदाची शाश्वती आहे का??, हा गंभीर प्रश्न आहे.
कारण महाराष्ट्रात “मी मुख्यमंत्री होणार” असे म्हणून कोणी मुख्यमंत्री झाल्याचे इतिहास सांगत नाही. काँग्रेसच्या राजवटीत कोणत्याही व्यक्तीची जाहीररित्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवण्याची हिंमतच नव्हती. ती अगदी काँग्रेसचे आत्तापर्यंतचे शेवटचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पाळली गेली. शिवसेना आणि भाजप मध्ये देखील बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचा शब्द डावलून कोणाची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवण्याची हिंमत नव्हती. पण काँग्रेस, बाळासाहेब ठाकरे आणि नंतर भाजप या तीनही प्रमुख पक्षांनी न जाहीर करतात आपापले मुख्यमंत्री महाराष्ट्रात करून दाखवले आहेत. उरता उरली राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांना मात्र त्या पदाला गवसणी घालणे कधी जमलेच नाही.
जाहीररित्या महत्त्वाकांक्षा बोलून दाखवून महाराष्ट्रात मुख्यमंत्री होता येत नाही, हा इतिहास असताना देखील अजितदादा काय किंवा जयंत पाटील काय त्या इच्छा बोलून दाखवत आहेत. पण अशा इच्छा फलद्रूप होतील का??, ही खूप मोठी शंका आहे. उद्धव ठाकरेंनी कधीच मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली नव्हती. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीररीमित्या तसे कधीही सांगितले नव्हते. तरीही ते नजीकच्या इतिहासात मुख्यमंत्री बनून गेले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही तसेच आहे. या दोन्ही नेत्यांनी केव्हाही मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली नव्हती. फडणवीस विधानसभेत “मी पुन्हा येईन”, असे म्हणाले. पण ते किमान अडीच वर्षे पुन्हा येऊ शकले नाहीत आणि अडीच वर्षानंतर ते जेव्हा पुन्हा आले, ते उपमुख्यमंत्री बनून आले आहेत. इतिहासाचा हा धडा राष्ट्रवादीचे नेते शिकणार का??, हा खरा प्रश्न आहे, की आपल्या महत्त्वाकांक्षा सतत बोलत राहुन ते राष्ट्रवादीच्या दृष्टीने इतिहासाची पुनरावृत्ती करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App