विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन पवारांच्या मध्ये आला शिवतारे तिसरा; त्यामुळे बारामतीकर कोणत्या पवारांना म्हणणार खासदारकी विसरा??, असा सवाल विचारण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या एका कठोर भूमिकेने आणली आहे. बारामतीचा सातबारा पवार कुटुंबाच्या नावावर नाही. बारामती तब्बल 5 लाख 80 हजार मते पवार कुटुंबाच्या विरोधात आहेत. त्यामुळे केवळ भाजप सांगतो म्हणून पवार कुटुंबाला मतदान करण्याचे काहीच कारण नाही, अशी कठोर भूमिका विजय शिवतारे यांनी मांडून नरेंद्र मोदी विचार मंच या नावाने निवडणूक लढवण्याची जाहीर घोषणा केली आहे. Vijay shivtare strongly oppose any pawar family candidate in baramati loksabha elections
विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबातल्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायला ठाम विरोध केला आहे. कोणीही सांगितले तरी पवार कुटुंबाचे काम निवडणुकीत करणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. शिवतारे यांच्या या ठोस भूमिकेमुळे बारामतीतल्या पवार कुटुंब विरोधी मतदारांमध्ये एकजूट निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलतना विजय शिवतारे म्हणाले की, जरी महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी आम्हाला निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागणार आहे. नरेंद्र मोदी हे 100 % पंतप्रधान झाले पाहिजेत, यात शंका नाही. परंतु भाजपने सांगितले म्हणून आम्ही पवारांचे काम करणार नाही. निव्वळ अजित पवार इकडे आले म्हणून काही होत नाही. कारण त्यांना कंटाळून लोक पक्ष सोडून गेले होते. जर त्यांनाच मतदान करायला भाजप सांगत असेल तर हे मला मान्य नाही. लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे, त्यातून मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. दोन्ही पवारांच्या लढाईमध्ये मी उतरणार म्हणजे उतरणार, अशी स्पष्टोक्ती शिवतारेंनी केली.
विजय शिवतारे म्हणाले की, ५० वर्षे ज्यांनी आम्हाला छळले, त्यांना निवडून देण्याची आमची मानसिकता नाही. त्यामुळे मी धाडस करुन अपक्ष उभा राहणार किंवा नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करणार, काहीही करणार. मी महायुतीच्या विरोधात नाही, महायुतीच्या इतर नेत्यांच्या विरोधात नाही. आमचा विरोध पवार काका – पुतणे आणि त्यांच्या इतर राजकीय कुटुंबाला आहे!!
लोकांना संधी तर मिळाली पाहिजे. लोक सध्या संभ्रमात आहेत. मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, कारण भाजपचे अंतिम उद्दिष्ट हे देश आहे. देशाप्रती त्यांची निष्ठा आहे. त्यामुळे सगळे भाजपसोबत येत आहेत. अजित पवार जरी आले असले तरी ते का आले हे सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही पवार नको म्हणून आम्ही तिसरा पर्याय ठेवत आहोत. पवारांनी दुसरा एखादा माणूस दिला, तर आम्ही नक्कीच काम करू. परंतु पवारांनी या भागाचे नुकसान केले असून आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा थेट इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App