विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव जिल्ह्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. लातूरला दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन तास गारपीट झाली. त्यात दोन ठिकाणी वीज कोसळून २१ वर्षीय तरुणासह ६५ वर्षीय वृद्ध महिला ठार झाली. तसेच जिल्ह्यात ९ गुरे दगावली. धाराशिवला वीज पडून पाच गुरे आणि १० शेळ्या ठार झाल्या.Stormy rains hit Marathwada; 2 victims in Latur; Chance of rain for next 3 days
नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडाली. शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचबरोबर बहुतांश शहरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. अग्निशमन विभागाकडे ४० तक्रारी आल्या. त्यानंतर ८ वाहनांनी व ११६ कर्मचाऱ्यांची व २ जेसीबींची मदत घेण्यात आली. सायंकाळी अर्ध्या तासात १६.३ मिलिमीटर पाऊस पडला.
पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस
विदर्भापासून ते पूर्व अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, शनिवारी वाशिम येथे उच्चांकी ४३.२ अंश तापमान नोंदवले गेले. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आगामी ७२ तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मान्सूनपूर्व म्हणजे उर्वरित एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App