शरद पवार यांनी केलेली संघ स्तुती हे खरं म्हणजे त्यांच्या विश्वासार्हतेवर संशयाची पेरणी आहे, पण त्या पलीकडे जाऊन भाजपसाठी ती “अँटी मिडास टचची” धोक्याची घंटी आहे. “मिडास टचने” सगळ्या वस्तू सोन्याच्या व्हायच्या. “अँटी मिडास टचने” सोन्याची माती होते!!
कारण शरद पवारांचे राजकारण म्हणजे विश्वासघात हे गेल्या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्रातले समीकरण राहिले. पवारांनी नेहमी स्व केंद्रीत राजकारण केले. उडाला तर कावळा, बुडला तर बेडूक, पण कोणत्याही स्थितीमध्ये आपण चर्चेत राहिलो पाहिजे याची “काळजी” पवारांनी नेहमी घेतली. मराठी माध्यमांनी बाकी कुठल्याही नेत्यापेक्षा शरद पवारांना चर्चेत ठेवण्यात मनापासून साथ दिली. पवारांना राजकारणामध्ये कितीही चढ उतार अनुभवावे लागले तरी त्यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा जास्त प्रसिद्धी मराठी माध्यमांनी दिली. पण म्हणून पवारांची राजकीय विश्वासार्हता मराठी माध्यमे देखील निर्माण करू शकली नाहीत किंवा टिकवू शकले नाहीत. कारण पवारांचे मूलभूत राजकारण हे नेहमीच स्व केंद्रीत बरोबर विश्वासघाताचेच राहिले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर खर म्हणजे पवारांचा अहंकार तुटला. महाराष्ट्रात कुठलीही राजकीय परिस्थिती असो, आपण आपल्या नावावर 50 – 60 आमदार निवडून आणूच शकतो, असे पवार नेहमी बोलून दाखवत असत. तसा 2024 पर्यंत त्यांचा अनुभव देखील होता. पण 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात पवारांच्या नावावर फक्त 10 आमदार निवडून आले. तिथे 50 – 60 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा दर्प तुटला. खरं म्हणजे याविषयी नेमके सवाल विचारून पवारांचे मत जाणून घेणे आणि अजूनही ते 50 – 60 आमदार आणू शकतात का??, यावर चर्चा घडविणे हे मराठी माध्यमांसाठी कर्तव्य होते. पण ते त्यांनी केले नाही. त्या उलट पवार वेगवेगळ्या पुड्या सोडत राहिले त्याचे वर्णन “पवारांनी डाव टाकला”, “चाणक्याने खेळी केली” याच शब्दांमध्ये मराठी माध्यमे करत राहिली.
पवारांनी केलेली संघ स्तुती ही त्याच स्वरूपाची आहे. संघाने शिस्तबद्ध पद्धतीने बारकाईने नियोजन करून भाजपला जिंकवून दिले, हा काही “नवा शोध” पवारांनी लावला नव्हता, पण पवारांनी संघाची स्तुती केली हे सांगण्यासाठी तो “शोध” पवारांच्या नावावर मराठी माध्यमांनी खपवला. संघात समर्पित कार्यकर्ते आहेत, तसे आपल्याकडे पण हवेत, असे मध्यंतरी पवार म्हणाले होते. त्याचेच रिपीटेशन त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत केले. त्यापलीकडे संघाच्या हिंदुत्व विचार प्रणालीची कुठली स्तुती पवारांनी केली नाही. संघाच्या कार्यपद्धतीची त्यांनी थोडक्यात स्तुती केली होती.
पण त्यावरून पवार आणि भाजप एकत्र येणार अशा अटकळी माध्यमांनी बांधायला सुरुवात केली. त्यात राजकारणात काहीही होऊ शकते, हे 2019 नंतर आपल्या लक्षात आले उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जातील, असे वाटले नव्हते, पण ते गेले. त्यामुळे आता पवार भाजपबरोबर येतील की नाही, त्यापेक्षा राजकारणात कोण कोणाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही, असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यामुळे पवार भाजप एकत्रित करण्याच्या चर्चेच्या फुग्यात आणखी हवा भरली गेली आणि इथेच खरं म्हणजे धोक्याची घंटी आहे.
कारण पवारांनी आत्तापर्यंत ज्या पक्षांशी युती आघाडी किंवा सोयरीक केली, त्या पक्षांना पवारांनी आपल्या “अँटी मिडास टचने” संपुष्टात आणले. एकवेळ पवार स्वतः संख्यात्मक दृष्ट्या संपले, पण त्यांनी युती किंवा आघाडीतल्या मित्र पक्षांना देखील संपवले. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही त्याची दोन ताजी उदाहरणे ठरली.
पण अगदी 1978 पासूनचे उदाहरणे घेतली तरी लाल निशाण पक्ष किंवा शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे पवारांचे मित्र पक्ष पवारांच्या “अँटी मिडास टच” मुळेच संपले. कारण पवारांना फक्त सत्तेचे लाभ घेण्यासाठी मित्र पक्षांशी युती किंवा आघाडी हवी होती. ती त्यांनी केली. सत्तेचे लाभ उपटले आणि त्याचवेळी “अँटी मिडास टचने” मित्र पक्षांना संपविले.
पवारांचे आमदार, खासदार सत्तेसाठी उतावळे
आता देखील पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्यांचे उरलेले आमदार + खासदार हे भाजप आणि अजित पवार यांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्यासाठी उतावळे झालेत. कारण त्यांना आपापले राजकारण साधून घ्यायचे आहे. आपापल्या सहकारी संस्था कायद्याच्या कचाट्यातून वाचवायच्या आहेत. केलेले घोटाळे दडपायचे आहेत. त्यापलीकडे भाजप किंवा संघाच्या विचारप्रणालीशी पवारांचे काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे पवारांनी केलेली संघ स्तुती ही खुद्द त्यांच्या राजकीय विश्वासार्हरतेविषयी जरी संशयाची पेरणी करणारी असली, तरी प्रत्यक्षात ती भाजपसाठी धोक्याची घंटीच आहे.
मग भले पवारांचे 8 खासदार लोकसभेत भाजपला काही मुद्द्यांवर आधारित अप्रत्यक्ष पाठिंबा देतीलही, पण लाँग टर्ममध्ये पवार कधीच संघ + भाजपच्या विचार प्रणालीच्या पातळीवर जुळवून घेणार नाहीत. उलट भाजप संघटनात्मक पातळीवर कसा कमकुवत होईल, भाजपमध्ये आपले आधीच “सोडलेले” नेते परत आपल्याकडे कसे येतील आणि आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सत्तेवर नियंत्रण कसे राहील, याच्याच कारवाया पवार सतत करत राहतील. आपल्या “अँटी मिडास टच”चा अनुभव पवारांची नेहमीच मित्र पक्षांना घ्यायला लावला. तो भाजपलाही घ्यायला लावतील हे काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेबरोबरच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App