विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 10 जागा लढवून 8 जागा निवडून आणणाऱ्या शरद पवारांना विधान परिषद निवडणुकीत मोठा आत्मविश्वास आला होता. अजितदादांचे आमदार आपण ताटातून वाटीत घेऊ, असे त्यांना वाटत होते. पण प्रत्यक्षात घडले उलटेच. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच 12 पैकी 1 मत फुटले. Sharad pawar lost credibility among small parties in MVA
पवार 12 आमदारांच्या गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना केवळ 12 मतं मिळाली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतील मतांच्या आधारावर निवडून आले. अजितदादांनी स्वत:च्या आमदारांची मतं राखत बाहेरुन 5 मतं खेचली आणि दोन्ही जागा जिंकल्या.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामुळे शरद पवारांनी महाविकास आघाडीतल्या छोट्या पक्षांच्या नेत्यांचा विश्वास गमावला.
संख्याबळ नसताना जयंत पाटील यांना पाठिंबा देत शरद पवार “नो रिस्क, मोअर गेन” असा डाव खेळले. आम्ही लहान पक्षांना सन्मान देतो, असा “पोलिटिकल मेसेज” त्यांनी दिला. आता पाटील जिंकले असते तर त्याचं श्रेय पवारांना मिळाले असते. पण तसं झालं नाही. पाटील पराभूत झाले. पण त्यामुळे पवारांच्या पक्षाचे फार मोठे नुकसान झाले नाही. पाटील यांच्या जागी पवारांच्या पक्षाचा उमेदवार पडला असता, तर ती पवारांसाठी मोठी नामुष्की ठरली असती. पण शरद पवारांनी छोट्या पक्षांच्या नेत्यांचा विश्वास मात्र गमावला.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थतता असून दादांचे आमदार माघारी परततील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दादांचे आमदार विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करतील अशी वदंता होती. पण तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे दादांची पक्षावर, आमदारांवर असलेली पकड स्पष्ट झाली. लोकसभेतील पराभवानंतरही आमदार अजितदादांच्या सोबत असल्याचा मेसेज यामुळे गेला.
जयंत पाटील यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला काहीसा ब्रेक बसला आहे. लोकसभेला राज्यात 30 जागा जिंकणाऱ्या महायुतीची गाडी सुसाट होती. पण आता विधान परिषदेतला पराभव विरोधकांच्या ऐक्यावर प्रश्न निर्माण करणारा ठरला. शरद पवार हे आपल्याला साथ देणाऱ्या छोट्या पक्षांच्या नेत्यांना राजकीय लाभ देऊन निवडून आणू शकत नाहीत, याची छोट्या पक्षांना खात्री पटली.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्यात महायुती यशस्वी ठरली. दादांचे काही आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि जयंत पाटील विजयी होतील, असे गणित शरद पवार गटाने आखले होते. पण तसे काहीच घडले नाही. उलट अजित पवारांनी बाहेरुन ५ मतं आणत शरद पवारांच्या राजकीय कौशल्याला धक्का दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App