नाशिक : ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे राजकीय मिथक जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी उद्ध्वस्त केले; त्याचवेळी अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा या निकालांनी स्पष्ट केली. Sharad Pawar
बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागताना सुरुवातीच्या कलांमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपच एक नंबर वरचा पक्ष ठरला. पण या निकालांच्या पहिल्या कलांमधला थोडा ट्विस्ट असा होता, की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मागे टाकले होते परंतु मतमोजणीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळवून पुन्हा दुसऱ्या नंबर वर आली. त्यामुळे अजित पवारांच्या ब्रँडची सुद्धा मर्यादा स्पष्ट झाली. ती मर्यादा तिसऱ्या क्रमांकाची आहे, हे महापालिका निवडणुका नंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
पण या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांचे सगळ्यात मोठे राजकीय इंगित असे, की ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना मानतो. ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाशी समाजकारणाची सगळी नस शरद पवारांनाच माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला इथे कोणी पराभूत करू शकत नाही, हे मिथक जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी उद्ध्वस्त केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 27 जागांवर समाधान मानावे लागल्याचे वास्तव राजकीय चित्र या निकालांनी समोर आणले.
– पवारांची पुढची पिढी कुचकामी
शरद पवारांचे वय त्यांनी न केलेला प्रचार हे जरी वास्तव असले तरी शरद पवारांची पुढची पिढी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी सुद्धा प्रचारात भाग घेतला नाही. आपल्या पक्षाचा किंवा तुतारी चिन्हाचा प्रचार केला नाही. त्यामुळे शरद पवार नावाचा ब्रँड ग्रामीण महाराष्ट्रात चालला नाही. याचा अर्थ शरद पवार हे उभारीने प्रचारात नसतील तर त्यांचे अनुयायी सुद्धा शस्त्र टाकून देतात आपापल्या वैयक्तिक निवडणुकांपुरते पाहतात हे वास्तव जिल्हा परिषद निवडणुकांनी आणि त्यांच्या निकालांनी सिद्ध केले.
– सहानुभूतीची सुद्धा मर्यादा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या ऐन मध्यावर वर अजित पवारांची अकाली एक्झिट झाली. त्यामुळे अजित पवारांच्या अकाली एक्झिटच्या सहानुभूतीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल ठरेल, असा होरा अनेक राजकीय निरीक्षकांनी बांधला होता. प्रत्यक्षात अजित पवारांच्या बारामती तालुक्यातच मतदान कमालीचे घटले होते. तिथे फक्त 54 % मतदान झाले. पण निकालांमध्ये मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चमकली. पण तिची चमक एवढी मोठी नव्हती की त्यामुळे भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाकोळली जाईल. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या यशाला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फार मोठा धक्का देऊ शकले नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा येऊ शकले नाही. या अर्थाने सुद्धा अजित पवारांच्या ब्रँडची मर्यादा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा नेता अशीच राहिली.
– पवारांच्या कक्षेबाहेर गेली जनता
शरद पवारांच्या तब्येतीच्या, वयाच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर सुद्धा त्यांचा ब्रँड ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा शिल्लक राहिला नाही, हे वास्तव जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी अधोरेखित केले. ग्रामीण महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या राजकीय कक्षेबाहेर निघून गेली. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपच्याच सत्तेला कौल दिला. महाराष्ट्रातला ग्रामीण मतदार असो किंवा शहरी मतदार असो तो सत्तेच्या बाजूने उभा राहतो हेच जिल्हा परिषद निवडणुकांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App