नाशिक : अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे. ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे नेते युतीवर भाष्य करत आहेत, पण सहज शक्य असूनही दोन्ही ठाकरे बंधू मात्र एकमेकांशी अजून बोलायला तयार नाहीत.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आत्तापर्यंत अनेकदा उद्धव ठाकरे मनमोकळे आहेत. ते केव्हाही राज ठाकरेंशी चर्चा करायला तयार आहेत, असे जाहीर केले. आमचे मन साफ आहे, असे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. त्यावर फक्त प्रसार माध्यमांमध्ये बोलून किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून कुठली युती होत नसते. दोन्ही ठाकरे बंधूंकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. ते एकमेकांशी केव्हाही बोलू शकतात, असे अमित ठाकरे म्हणाले. याच दरम्यान नाशिक मधून शिवसेना – मनसे युतीच्या चर्चेचे आवाज उठले. सत्यनारायणाच्या पूजेला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनसेच्या राजगड कार्यालयात एकत्र आले.
पण दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रसार माध्यमांमध्ये जेवढ्या वेळा मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा केली किंवा कोणत्याही ठिकाणी एकमेकांशी संवाद साधला, त्यापैकी एकाही वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी फोन उचलून एकमेकांशी चर्चा केली नाही.
महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला, पण त्यांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना अजून फोन केला नाही. उद्धव ठाकरेंचाही राज ठाकरे यांना फोन आला नाही. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे यावे. राज ठाकरे 100 पावले पुढे येतील, असे हे दोन्ही नेते म्हणाले. त्याचवेळी दोघांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना पहिला फोन करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
– मनसेचे तोंड पोळले
2014 आणि 2017 मध्ये मनसेचे तोंड पोळले. बाळा नांदगावकर युतीसाठीच मातोश्रीवर गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटही दिली नाही. त्यामुळे आम्ही आता ताक देखील फुंकून पितो. आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा. राज ठाकरे त्यांना लगेच प्रतिसाद देतील, असे संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव म्हणाले.
– बाराखंबा रोडला वळसा?
शिवसेना – मनसे युतीची चर्चा अजूनही अशी नेत्यांच्याच पत्रकार परिषदांमध्ये अडकली आहे. त्या पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांना टाळी देण्याची, पावले पुढे टाकण्याची आणि फोन कॉलची भाषा वापरली जाते. पण अजूनही मातोश्री आणि शिवतीर्थ यांच्यातले फोन उचलले जात नाहीत आणि त्यातून एकमेकांशी बोलले जात नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे “अंतर” अजूनही कमी होताना दिसत नाही. मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन्ही ठिकाणांचा रस्ता दिल्लीतल्या बाराखंबा रोडला वळसा घालून येतो की काय??, हे समजायला मार्ग नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App