विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mundhwa Land Case दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी पुण्यातील मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे त्या वेळी अजित पवारांनी जमीन व्यवहार रद्दची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांवर पार्थ यांची सही नाही, या मुद्द्याचा आधार बनवून पार्थ यांना खारगे समितीने क्लीन चिट दिली, तसा अहवाल सरकारकडे सादर झाला, असे म्हटले जात आहे.Mundhwa Land Case
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अहवाल आल्याची कबुली दिली. मात्र, भोयर म्हणाले की, यात कोणालाही क्लीन चिट देण्याचा प्रकार नाही. सूत्रांनी सांगितले की, जमीन व्यवहार करणाऱ्या अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे ९९% शेअर्स असूनही केवळ कागदपत्रांवर ‘सही’ नसल्याचा तांत्रिक आधार त्यांना वाचवण्यासाठी वापरला जात आहे. अहवालात तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे,Mundhwa Land Case
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. “एवढा मोठा व्यवहार सामान्य माणूस करूच शकत नाही, त्याला बड्यांचा वरदहस्त होता. जो भाजपसोबत आहे तो ‘स्वच्छ’ आहे, मग त्याने कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला शिक्षा होणार नाही. आम्ही विधानसभेत यावर सरकारला जाब विचारू,” असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी बचावात्मक पवित्रा घेत, “कदाचित कंपनीच्या इतर संचालकांनी पार्थ पवारांना अंधारात ठेवून व्यवहार केला असावा, त्यामुळे त्यांचा संबंध नसावा,” असा दावा केला.
घरगुती पाठबळ आणि टोलेबाजी
खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थवरील विश्वासाचा पुनरुच्चार करताना सांगितले की, “आमच्या घरातील मुलांवर चांगले संस्कार आहेत, तो काहीही चुकीचे करणार नाही.” तर रोहित पवार यांनी “काही केलंच नसेल म्हणून क्लीन चिट मिळाली असेल. आता ज्यांनी टीका केली त्यांनी माफी मागावी,” असा टोला लगावला आहे.
‘कोणतेही ‘काका’ वाचवू शकणार नाहीत : अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री फडणवीसांना नुकताच संदेश पाठवला आहे. मुळात या अहवालात पार्थ यांना ‘क्लीन चिट’ मिळणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. कोणतेही ‘काका’ त्यांना या प्रकरणातून मुक्त करू शकत नाहीत. पार्थ यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई झाली असल्यानेच त्यांच्या क्लीन चिटच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचे दिसत आहे. ही बातमी फडणवीस पेरतायत की तटकरे? सद्य:स्थितीत मी इतकेच ठामपणे सांगू शकते की, खारगे समिती असा अहवाल देऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App