विशेष प्रतिनिधी
जालना : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात गावागावातून उमेदवार उभे करण्याचा मराठा समाजाचा निर्णय मनोज जरांगे यांनी फिरवला. त्याऐवजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकच मराठा अपक्ष उमेदवार देऊन त्याला मराठा व्होट बँक तयार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. Manoj jarange contemplate to make new maratha vote bank
अंतरवली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या संवाद बैठकीत मनोज जरांगे यांनी दोन प्रस्ताव दिले होते. यातील एका पर्यायावर तिथे हजर राहिलेल्या मराठा प्रतिनिधींनी सहमती दर्शवली.
पहिला पर्याय काय?
उपस्थित मराठा प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी पहिला पर्याय दिला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भरपूर मराठा समाजाच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्यास अडचणीचे ठरू शकते. सर्वांनीच अर्ज भरल्यास आपली मराठा मते विखुरतील. ज्याला फायदा व्हायला नको होता, त्याला फायदा होऊ शकतो. त्याऐवजी मराठा व्होट बँक तयार करून दलित आणि मुस्लिमांनाही आपल्याबरोबर घेता येईल. प्रत्येक जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अपक्ष म्हणून उभा करता येईल. हा निर्णय मी घेणार नाही. तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.
दुसरा पर्याय काय?
मनोज जरांगे यांनी या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने घ्यावयाच्या भूमिकेबाबत सांगताना दुसरा पर्याय दिला. मात्र मराठा समाजाने हा पर्याय स्वीकारला नाही. जरांगे म्हणाले की, लोकसभा निवडणूक हा आपला विषय नाही. तिथे आपले कोणीही ऐकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय असा आहे, तो म्हणजे आपण अर्ज भरायचा नाही. त्याऐवजी मराठा समाजाने इतर पक्षांच्या उमेदवाराकडून बॉन्डवर लिहून घ्यायचे. निवडून आल्यावर सगेसोयऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देणार, असे यात लिहून घ्यायचे. आपल्याला पक्षाचा भेद नको. पक्षाचा विचार करायचाच नाही, असा पर्याय जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवला. मात्र सभेला आलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी हा दुसरा पर्याय फेटाळला. त्यामुळे जरांगेंनी हा पर्याय सोडून दिला, असे त्यांनी सभेतच जाहीर केले.
सत्ताधारी, राजकीय नेत्यांवर टीका
आपण लढायचं ठरवलं आहे. त्यामुळे सर्वच संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आपण 75 वर्षे त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. आता मात्र मराठ्यांनी चाणाक्षपणे बुद्धीचा वापर करायचा. आपला समाज, आपली लेकरं कसे मोठे होतील यासाठी लढा चालू केला आहे. काहीही झालं तरी लेकरापेक्षा मोठं कोणीही नाही हे समूजन घ्या. ज्यांना मोठं केलं ते आपल्याच मुलांच्या डोक्यावर पाय देत आहेत. आपण सरकारला भरपूर संधी दिली आहे. शेवटी आता मराठा समाजाचा नाईलाज झाला आहे. आपण सरकारला वेळ दिला. सरकारने डाव साधला आहे. अटीशर्ती आम्हाला घातल्या जात आहेत. पण शर्तीच्या बाहेर जाऊन सरकार काम करत आहे. त्यामुळे निर्णायक भूमिकेवर येणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही जरांगे म्हणाले.
किती मतदारसंघांना फटका??
आपला विषय हा लोकसभेत नाही. आपला विषय हा विधानसभेत आहे. आपला राज्यपातळीवरचा विषय आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघांवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. तिथे कोणाचाही “कार्यक्रम” होऊ शकतो. या मतदारसंघांतून आपल्याशिवाय कोणीच निवडून येऊ शकत नाही, असा दावा जरांगे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App