“दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ”, ही मराठीत म्हण आहे… पण विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा एकजिनसीपणा तुटला आणि तिघांनी आपापले पाहिल्यामुळे एकाचा लाभ झाला आहे!! त्यामुळे “तिघांचे भांडण एकाच लाभ” अशी नवीन म्हण तयार झाली आहे!! Maharashtra state council Elections : devendra Fadanavis showed his strength to Pawar and Sonia Gandhi
– दुसर्यांदा मात
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या मतांच्या बीजगणिताच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर राज्यसभा निवडणुकीत पाठोपाठ दुसऱ्यांदा मात केली आहे. भाजपकडे पुरेशा मतांची बेगमी नसताना देखील केवळ फडणवीसांनी केलेल्या मतांच्या योग्य नियोजनाचा हा विजय आहे. दुसऱ्या पसंतीची सर्व मते आपल्या शेवटच्या उमेदवाराला देऊन फडणवीसांनी आकडेवारीत आपण महाविकास आघाडीच्या तथाकथित चाणक्यांपेक्षा जास्त भारी आहोत हे दाखवून दिले आहे!!
– पवार दिल्लीला निघून गेले तेव्हाच…
खरे म्हणजे या निवडणुकीचा निकाल तसा वेगळा लागणार नव्हता, हे शरद पवार दिल्लीत गेल्या पासूनच स्पष्ट होते. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादीची सीट “सेफ” करून ठेवली होती. आपला तोटा होणार नाही याची चोख व्यवस्था करूनच जे काय डावपेच खेळायचे तुमचे तुम्ही खेळा, असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने स्पष्ट केले होते. त्याचा राज्यसभेत फटका शिवसेनेला बसला आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फटका काँग्रेसला बसला. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत तोटा झाला नाही असा महाविकास आघाडीतला पक्ष फक्त राष्ट्रवादी आहे आणि दोन्ही निवडणुकांमध्ये फायदा झाला असा पक्ष भाजप आहे!! यात काय ओळखायचे ते ओळखा!!
– पार्श्वभूमी राष्ट्रवादीची
शिवाय भाजपच्या विजयी झालेल्या दोन्ही उमेदवारांची म्हणजे धनंजय महाडिक आणि प्रसाद लाड यांची राजकीय पार्श्वभूमी नीट लक्षात घेतली तर ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. अर्थात म्हणून मराठी माध्यमे नेहमी उचलून धरतात तसे हे उमेदवार पवारांनीच निवडून आणले असे म्हणण्यात काही अर्थ नाही कारण राष्ट्रवादीचे तिकीट मिळून देखील हे दोन्ही उमेदवार सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पडले आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतःचे राजकीय भवितव्य नीट ओळखून राष्ट्रवादी सोडून भाजपचा मार्ग पत्करण्याची दिसत आहे.
– अजितदादांनी गणित नीट बसवले नाही
मराठी माध्यमांनी शरद पवारांना महाराष्ट्राचे चाणक्य ठरवून टाकले आहे. त्यावर आधारित विश्लेषण करताना ही माध्यमे नेहमी आता दुसरा चाणक्य कोण?? असे विचारत असतात. विधानपरिषद निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशीच शरद पवार दिल्लीला निघून गेले. अजित पवारांनी सगळ्या हालचाली केल्या. काँग्रेसचे नेते यांना भेटून सगळी रणनीती ठरवत होते. त्यांनी देखील मतांचे गणित जो व्यवस्थित बसवेल तो विजयी होईल असे म्हटले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे गणित व्यवस्थित बसवले. पण काँग्रेसचे गणित व्यवस्थित बसवले नाही असाच त्याचा अर्थ होतो!!
– फडणवीसच चाणक्य
राज्यसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी धडा घेऊन शिवसेनेचे मतांचे गणित नीट बसवले आणि काँग्रेसचे गणित मात्र त्यामुळे बिघडले. मराठी माध्यमांनी विधान परिषद निवडणुकीत चाणक्य कोण? अजित पवार की देवेंद्र फडणवीस??, असे स्पर्धा लावली होती. हाच निकष लावायचा तर देवेंद्र फडणवीस हेच चाणक्य ठरल्याचे म्हणावे लागेल… पण ही चाणक्यगिरी “तिघांचे भांडण एकाचा लाभ” या सदरात मोडते आहे, हे अधोरेखित करावे लागेल.
कोणाला किती मते?
महाविकास आघाडी
शिवसेना
सचिन अहिर-26 आमशा पाडवी-26
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे- 27 रामराजे निंबाळकर- 26
काँग्रेस
चंद्रकांत हंडोरे- 26 भाई जगताप- 20
भाजप
श्रीकांत भारतीय- 26 प्रवीण दरेकर-26 राम शिंदे- 26 उमा खापरे- 26 प्रसाद लाड- 26
असे होणार पक्षीय बलाबल
या निकालामुळे आता विधान परिषदेतील पक्षीय बलाबलात बदल झाला आहे.
भाजप – २४ शिवसेना – १४ राष्ट्रवादी काँग्रेस – १० काँग्रेस – १० शेकाप – २ राष्ट्रीय समाज पक्ष – १ अपक्ष – ५ राज्यपाल नियुक्त (रिक्त) – १२
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App