नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले. तिथे त्यांनी सगळी सूत्रे महाविकास आघाडीत नसलेल्या राज ठाकरे यांच्याकडे देऊन आघाडीतल्या आपल्या विशिष्ट स्थानाची किंमत कमी करून घेतली. काँग्रेसने महाराष्ट्रात पठाडी बाहेरचा प्रदेशाध्यक्ष जरूर नेमला, पण हर्षवर्धन सपकाळ अजून तरी तेवढी संघटनात्मक चमक दाखवू शकले नाहीत. ते निवडणूक आयोगासमोर महाविकास आघाडीतल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेतृत्व करायला गेले नाहीत. ते नेतृत्व बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या पठाडीबाज नेत्यांच्याकडेच काँग्रेसने सोपविले. निवडणूक आयोगासमोर दुसऱ्या दिवशी शरद पवार गेले नाहीत, याची दखल माध्यमांनी घेतली. शरद पवार गेले नाहीत, याच्याच बातम्या माध्यमांनी जास्त केल्या. पण निवडणूक आयोगासमोर गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सामील नव्हते, याची कुणी साधी दखलही घेतली नाही. Maharashtra Congress
– 14 खासदारांची ताकद
पण त्या पलीकडे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सवाल तयार झाला तो म्हणजे काँग्रेस 16 आमदार असले आणि त्यांची ताकद घटली असली, तरी त्या पक्षाचे आजमितीला महाराष्ट्रात चिन्हावरचे 13 आणि विशाल पाटील यांच्यासह धरून 14 खासदार आहेत. हे सगळे खासदार करताहेत काय?? त्यांच्या पक्षासाठी काही उपयोग आहे की नाही??, महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 14 खासदार असणे हा काही लहान सहान आकडा आणि लहान सहान ताकद नाही. या सगळ्यांनी एकवटून महाराष्ट्रात काम केले, तर काँग्रेस पुन्हा उभारी घेतल्याशिवाय राहणार नाही.
– 140 मेळाव्यांचा धडाका
काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सगळ्या खासदारांना बोलवून तुमच्या लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 मेळावे भरावा. यापैकी 6 मेळावे तालुका निहाय ठेवा आणि उरलेले 4 मेळावे नगरपरिषदा, नगरपालिका किंवा महापालिका परिक्षेत्रांमध्ये ठेवा असे नुसते सांगितले, तरी महाराष्ट्रात 140 मेळाव्यांचा धडाका उडेल. तिथून काँग्रेसची ताकद एकदम सोळा आमदारांवरून 40 – 50 आमदारांपर्यंत असल्याचा निदान राजकीय आभास निर्माण होईल. आणि या आभासाचा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण निवडणुका जिंकण्याची तंत्र काँग्रेससाठी नवीन नाही त्यांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले असले तरी त्या राजकीय नाटकाच्या पलीकडे दुसरे तिसरे काही नाही. पण काँग्रेस निवडणुका जिंकण्याच्या तंत्रामध्ये माहीर आहे, याबाबत सध्या जरी भाजपा आघाडीवर असला, तरी निवडणुका जिंकण्याच्या तंत्रात काँग्रेसवाले भाजपवाल्यांचे बारसे जेवले आहेत हे सांगण्यात किंवा कबुली देण्यात काहीही गैर नाही.
– आत्मविश्वास वाढवा
काँग्रेसमध्ये अभाव आहे, तो फक्त आत्मविश्वासाचा आणि संघटना म्हणून कामाला लागण्याचा. काँग्रेसने आपल्या 14 खासदारांची ताकद ओळखली आणि त्यांना कामाला लावले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षात धुगधुगी आणण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये छाप पाडण्याइतपत कामगिरी करण्यासाठी बरेच काम होण्याची शक्यता आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी केले पाहिजे उगाच माध्यमांच्या नादी लागून स्वबळाच्या बेटकुळ्या काढण्यापेक्षा काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपल्या 14 खासदारांना कामाला लावावे त्यातून काँग्रेसचे काम जास्त होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App