विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?, या विषयावरचा वाद आता आणखीनच टोकाला पोहोचला असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहारच्या माध्यमातून उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे विश्वासघाताने मुख्यमंत्री बनल्याचा वार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती. बैठकीत त्यांचे हात मी वर केले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, असा पलटवार शरद पवारांनी केला. Fadnavis’s attack, Pawar’s retaliation and now Rane’s attack; Because the necklace for the post of Chief Minister is around Thackeray’s neck !!
पण आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे स्वतः चालत शरद पवारांकडे गेले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणे शक्य नाही म्हणून मलाच मुख्यमंत्री करा अशी विनंती करून स्वतः मुख्यमंत्री बनले, असा प्रहार नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात उकळायला लागली आहे.
नारायण राणे यांनी प्रहार मधून उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री कसे झाले? हा प्रश्न गेली पावणे दोन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला आहे. पण नारायण राणे यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री काय घडले होते, याची माहिती राणेंनी दिली आहे.
मला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण ते नेमके मुख्यमंत्री कसे झाले ते आम्हाला माहिती आहे, अशा शब्दांत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घेऊन पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा इतर कोणी शिवसैनिक नव्हता. ‘साहेब आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. त्यामुळे आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे’ , असे या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितले असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी प्रहारमधून केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या विनंतीला संजय राऊत यांनीही दुजोरा दिला. त्यावेळी वा!! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो, असे शरद पवार त्यांना म्हणाले होते. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर केल्याचा खुलासा प्रहारमधून करण्यात आला आहे. त्यामुळे आता आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिणे सोडा. शिवसेना आता वाघ राहिली नाही, तिची मांजर, शेळी झाली आहे, असा थेट हल्ला शिवसेनेवर प्रहारमधून करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आपण पूर्ण केले, असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले. पण त्या निव्वळ थापा असल्याचे प्रहारमधून म्हटले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन हा शब्द तुम्ही साहेबांना दिलात आणि स्वतःच मुख्यमंत्री झालात, असा खळबळजनक आरोपही राणेंनी प्रहारमधून केला आहे. यापुढे तर शक्य नाहीच, पण भविष्यात पुन्हा कधी संधी मिळालीच तर हे ठाकरे सोडून कोणालाही मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केली आहे.
भाजपा देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही 56. राज्यात भाजपा 106 बहुमतासाठीचा आकडा 145 त्यामुळे तुम्ही केवळ आयत्या बिळावरचे नागोबा आहात, असा आरोप राणेंनी केला आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांची बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जीभेचा सैरावैरा वापर करू नका, असा थेट इशाराही प्रहारमधून शिवसेनेला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App