आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशदा, पुणे येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तम प्रशासनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा, तंत्रज्ञान समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी 5 वर्षांमध्ये आपल्याला नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. ‘लखपती दीदी’सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा येथे ग्रामविकास विभागाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उदघाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण, तसेच राज्यातील 20 जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर आधारित पुस्तिकेचे व महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन केले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव, यशदाचे महासंचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App