नाशिक : याला म्हणतात काँग्रेस!!, नुसती लढाईची चुणूक दाखवून पवारांना आणले गुडघ्यावर!!, तेव्हा कुठे माघार घेतली पवारांनी फोन केल्यावर!!, हेच राजकीय वास्तव बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या म्हणजे ९ एप्रिल २०२६ या दिवशी समोर आले. Sharad Pawar
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी. काँग्रेसने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा, अशी मागणी करण्यासाठी खुद्द शरद पवारांना मैदानात उतरावे लागले. त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करावा लागला. मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय सांगतो, असे सांगावे लागले. त्यानुसार गांधी परिवाराशी चर्चा केल्यानंतरच बारामतीतल्या काँग्रेसचा उमेदवार मागे हटला, हे सगळे काँग्रेस नावाच्या पक्षामुळे घडले. एरवी भाजप सारखा पक्ष इथे असता, तर पवारांनी त्याला केव्हाच गुंडाळून ठेवला असता. पण पवार काँग्रेसला त्या पद्धतीने गुंडाळू शकले नाहीत. त्यांना स्वतःची बारामती राखण्यासाठी फक्त प्रदेश पातळीवर प्रयत्न करून थांबता आले नाही. त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवर किंबहुना राष्ट्रीय अध्यक्षांच्या पातळीपर्यंत जाऊन बोलावे लागले, तेव्हा कुठे काँग्रेसने बारामतीला उमेदवार मागे घेतला.
मग भले “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी “पवारांनी फोन फिरवला”, “पवारांनी भाकरी फिरवली”, असल्या गमजा मारल्या असतील, तरी बारामतीतले पवारांचे वर्चस्व टिकवण्यासाठी खुद्द शरद पवारांना मैदानात उतरावे लागले. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षांपर्यंत बोलावे लागले, हे वास्तव बदलण्याची शक्यता नाही.
पार्थने केली होती पवारांची गोची
या दरम्यानच्या काळात खुद्द त्यांच्या नातवानेच म्हणजे पार्थ पवारने पवारांची पुरती गोची केली होती. काँग्रेसने बारामतीत उमेदवार देऊन त्यांचा डाऊनफॉल सुरू केला, असे वक्तव्य पार्थने केल्याने पवारांना बॅकफूटवर जावे लागले. पार्थ पवार वरचा जुना राग काढावा लागला. तो अपरिपक्व असल्याचे सांगावे लागले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना सुद्धा पार्थची बाजू उचलून धरता आली नाही. त्याउलट पार्थला वेगवेगळ्या शब्दांमध्ये सुनवावे लागले. रोहित पवारांना हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन पार्थच्या वक्तव्य विषयी दिलगिरी व्यक्त करावी लागली, तरीसुद्धा काँग्रेसने लगेच माघार घेतली नाही.
खुद्द सुनेत्रा पवारांना हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करावा लागला. तेव्हा सुद्धा हर्षवर्धन सपकाळ हे बारामती बाबत पवारांना हवा तसा अनुकूल निर्णय देऊ शकले नाहीत. त्यांना सुद्धा काँग्रेस हायकमांडला विचारावे लागले. शरद पवारांना सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करावा लागला मल्लिकार्जुन खर्गे यांना गांधी परिवाराशी चर्चा करावी लागली, तेव्हा कुठे काँग्रेसच्या उमेदवाराने बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली.
– बारामतीतल्या असंतोषाला पवार घाबरले
वास्तविक बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढली असती, तर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला असता, असे बिलकुल नाही. पण बारामतीत पवारांविरुद्धच्या असंतोषाला तोंड नक्की फुटले असते. काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष, जो खुद शरद पवारांचा सुद्धा पितृ पक्ष आहे, निवडणूक लढवतोय म्हणल्यावर बारामतीतल्या पवार विरोधकांनी नक्की उचल खाल्ली असती. बारामतीतून पवारांचा काही प्रमाणात का होई ना, पण एक सक्षम विरोधक समोर आला असता. नेमके हेच पवार कुटुंबीयांना खटकत होते.
“बारामती म्हणजे पवार” आणि “पवार म्हणजे बारामती” या समीकरणाला धक्का लागणे म्हणजे शरद पवारांची प्रतिष्ठा धुळीस मिळणे, असे सगळे पवार कुटुंबीय मानत होते. त्यामुळेच पवार कुटुंबीयांनी जबरदस्त जोर लावून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायचा चंग बांधला होता. त्यात काँग्रेस नावाचा राष्ट्रीय पक्ष अडथळा ठरत होता. तो अडथळा दूर करण्यासाठी खुद्द शरद पवारांना मैदानात उतरावे लागले. स्वतःचीच बारामती टिकवून धरण्यासाठी थेट काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत फोन करून बोलावे लागले. हे सगळे राजकारण काँग्रेसने फक्त लढाईची चुणूक दाखवून घडवून आणले. पवारांना गुडघ्यावर आणले, तेव्हाच कुठे काँग्रेसने बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. अन्यथा सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांचे ऐकून काँग्रेसने बारामतीतून माघार घेतली नसती. कारण काँग्रेसला पटवणे हा त्यांच्यापैकी कुणाचाच “घास” नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App