विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? आमच्या लेकराबाळांनी शिक्षण व नोकऱ्या करायच्या नाही का? असे उद्विग्न प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केले. आरक्षणाच्या लढ्यात अगोदर आम्ही संपू, त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण आता कुणीही आत्महत्या करू नका, असेही ते यावेळी ओबीसी तरुणांना उद्देशून म्हणाले.Chhagan Bhujbal
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वागदरी येथील भरत महादेव कराड नामक एका 35 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. राज्यातील बडे ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी शुक्रवारी आपले सर्वच कार्यक्रम रद्द करत या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हापासूनच देशभरातील ओबीसींना आरक्षण मिळवण्याचा लढा सुरू झाला. त्यात भरत कराडसारख्या अनेक तरुणांनी आपले बलिदान दिले.Chhagan Bhujbal
आमच्यावर अतिक्रमण करू नका
आताही आम्ही आरक्षणाच्या हक्कासाठी लढत आहोत. आमच्यावर अतिक्रमण करू नका एवढेच आमचे म्हणणे आहे. आम्ही दुसरे काहीच मागत नाही. मराठा समाजासाठी 50 टक्के मोकळे आरक्षण होते. उर्वरित 50 टक्क्यांमध्ये आम्ही दलित, आदिवासी व ओबीसी होतो. भटके विमुक्तही आमच्यासोबत होते. ते नको म्हणाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडब्ल्यूएस आणले. त्यातून जे गरीब आहेत, मागास आहेत. अर्थात मागास म्हणजे जे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, तर ते पैशाने व शिक्षणाने मागास आहेत, त्यांना 10 टक्के आरक्षण दिले. त्यात सर्वाधिक मराठा समाजाच्या 90 टक्के लोकांना फायदा मिळाला. आम्ही त्याला विरोध केला नाही.
त्यानंतर त्यांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मागितले. त्यानंतर सरकारने त्यांना 10 टक्के आरक्षण दिले. आता ते म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. आमचे म्हणणे असे आहे की, आमच्याकडे केवळ 17 टक्के आरक्षण शिल्लक आहे. आमच्याकडे भटकेविमुक्त आहेत. त्यांच्याकडे घरेदारे नाहीत. ते वणवण भटकत असतात. या गरिबांसाठी हे आरक्षण आहे. हायकोर्टानेही मराठा समाजाला आरक्षण तुमच्यासाठी नाही तर या लोकांसाठी असल्याचे सांगितले. या देशातील सर्वात मोठ्या सुप्रीम कोर्टानेही आरक्षण हे गरिबांसाठी असल्याचे सांगितले.
त्यानंतरही हे ऐकायला तयार नाहीत. त्यांना ओबीसीतच आरक्षण हवे आहेत. त्यामुळे आम्ही जे खरोखर कुणबी असतील त्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी शिंदे समिती स्थापन झाली. या समितीने 2 वर्षे काम केले. लाखो कागदपत्रे तपासली. सव्वादोन लाख कुणबी प्रमाणपत्र दिली. ती मंत्रिमंडळाने स्वीकारली. आम्ही गप्प बसलो. आता त्यांचे कामच संपले. कारण, जे कुणबी होते त्यांना प्रमाणपत्रे मिळाली.
आमचा जन्म लहान समाजात झाला हे पाप आहे का आमचे?
छगन भुजबळ म्हणाले, आता त्यांनी (मनोज जरांगे) मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मग आम्ही कुठे जायचे? आम्ही काय पाप केले? आमचा जन्म लहान समाजात झाला हे पाप आहे का आमचे? आमच्या लेकराबाळांनी शिकायचे नाही, नोकऱ्या करायच्या नाही. तुम्हाला वेगळे दिले ते घ्या ना… कितीही घ्या. पण आमचे आहे तेवढे राहूद्या. आम्ही 54 टक्के आहोत. पण आम्हाला अर्धेच आरक्षण दिले आहे. ते तर राहू द्या. म्हणून आमचा हा लढा सुरू आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 ते 700 कोटी रुपये दिले. याउलट ओबीसी महामंडळाला 5 कोटी दिले. अरे हा कोणता न्याय आहे?
ओबीसींनी आत्महत्येचा मार्ग पत्करायचा नाही
छगन भुजबळ यांनी यावेळी ओबीसी तरुणांना आत्महत्या न करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, आमच्यात अठरापगड जाती आहे. पण त्यानंतरही आमच्यात बोलण्याचीही ताकद नाही. आमच्याकडे काहीच नाही, त्यामुळे ते काय बोलतील? आत्ता आम्ही लढत आहोत. त्यानंतरही एक तरुण गेला. त्याने नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. आपल्याला लढायचे आहे. कुणीही आत्महत्या करू नका. आम्ही आहोत ना. अगोदर आम्ही संपू, मग तुम्ही काय करायचे ते करा, पण तुम्ही काही करू नका. तुम्ही लढण्याच्या जिद्दीने पुढे या. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. आपण लोकशाहीच्या मार्गाने पुढे जाऊ, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App