विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील नागरी क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यातील 11 महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या 648 किमी लांबीच्या विविध मेट्रो प्रकल्पांसह मुंबई, पुणे, नागपूर या शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली.
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईसारख्या महानगरात मेट्रो प्रकल्प अपरिहार्य असून आगामी मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य-केंद्र 50:50 भागीदारीत काम करणे शक्य आहे. त्यासाठी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करावेत. विविध प्रकल्पांच्या व्यापक आणि अधिक प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्थेवर भर देत सांगितले की, रेल्वे, बस आणि मेट्रो यासाठी एकत्रित तिकीटप्रणाली अंमलात आणण्यात आली आहे. पुण्यातील 2 नवीन मेट्रो प्रकल्प केंद्राने मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने काही मेट्रो प्रकल्प आपला निधी वापरून राबवले असून त्यामध्ये केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री आवास योजना व अमृत योजनेसाठी मिळालेल्या निधीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राने 2023 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठीही आवश्यक निधी आणि सहकार्य केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App