नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि नेतृत्वाची देखील खेचाखेच!!, हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले राजकीय वास्तव आता उघड झाले. अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादीतला cementing force संपला. तिथे दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधून त्या पक्षाचे अध्यक्ष पद मिळवण्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात स्पर्धा तयार झाली. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये कोटा ठरवून मंत्रिमंडळात फेररचनेची सुद्धा स्पर्धा तयार झाली. NCP leaders
– दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची अस्वस्थता
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये अजित पवारांची खाती नेमकी कोणाकडे द्यायची??, सगळ्यात महत्त्वाचे असे अर्थ खाते कुणाला मिळणार??, यावर प्रचंड स्पर्धा तयार झाली. अजित पवारांच्या इतर खात्यात संदर्भात सुद्धा मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये इच्छा निर्माण झाली.
– मंत्री आणि आमदारांचे लॉबिंग
अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐक्य होणार असेल आणि संपूर्ण फेररचना होणार असेल, तर त्या फेररचनेत आपल्यालाही वाटा मिळावा यासाठी विद्यमान मंत्र्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी लॉबिंग सुरू केली. राज्याचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना गेले तरी अजित पवारांची बाकीची खाती आणि फेररचनेत आपली संधी वाढावी, यासाठी अनेकांनी हस्ते परहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी केल्याची बातमी समोर आली.
– अनेकांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या
दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार मिळून एकूण 51 आमदार अशी शक्ती तयार होईल. पण त्याच वेळी पॉवर शेअरिंग करावे लागेल. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडे आठ मंत्री पदे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा कोटा एक किंवा दोन मंत्रिपदांपेक्षा जास्त वाढवून देणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदाची आणि त्यातल्या फेररचनेसाठी स्पर्धा तीव्र होत चालली आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य करायचे आमदारांचे बळ वाढवायचे आणि त्या बळावर अजित पवारांचे अर्थ खाते आपल्याकडे घ्यायचे असा राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांचा इरादा आहे. यात छगन भुजबळ, जयंत पाटील हे नेते आघाडीवर आहेत. जयंत पाटलांची आपले पूर्वीचे अर्थ खाते मिळवायची आकांक्षा फुलली आहे.
– पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांचा ऐक्याला विरोध
त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याला सुप्त विरोध आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐक्य झाले आणि त्या एकीकृत पक्षाचे अध्यक्षपद आणि मुख्य नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे गेले, तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांचा पत्ता आपोआप कट होण्याची त्यांना भीती वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA)आली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात राज्यमंत्री होण्याची संधी आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ते पद देऊ केले होते. परंतु प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे त्यांनी केंद्रातले राज्यमंत्रीपद स्वीकारायला नकार दिला होता. आता जर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली, तर प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कायमचा कट होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्याकडे लोकसभेची खासदारकी असून सुद्धा त्यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता नाही. छगन भुजबळ यांचे राज्यातले मंत्री पद धोक्यात येऊ शकते. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा पत्ता सुद्धा परस्पर कट होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्याच नेत्यांचा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला विरोध आहे.
या राजकीय पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐक्य साधून आणण्याच्या मागे त्या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांची मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि नेतृत्वासाठी मोठी खेचाखेच सुरू असल्याचेच चित्र उघड्यावर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App