विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात तब्बल 21 दिवसानंतर मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये गुंडांचे राज्य चालू देणार नाही, अशी ग्वाही दिली. संतोष देशमुख प्रकरणातल्या सगळ्या दोषींना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी हमी दिली. संतोष देशमुख यांच्या भावाशी फडणवीस फोनवरून बोलले. पण त्याचवेळी फडणवीसांनी संतोष देशमुख प्रकरणात ज्यांना राजकारण करायचे आहे, ते त्यांचे त्यांना लखलाभ, अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात टिप्पणी केली.
पण या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र कुठल्याच प्रश्नांची उत्तरे द्यायला समोर आले नाहीत. त्याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठला प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यासारखी प्रवृत्ती पोसली, तिचे भरण पोषण केले, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, पण त्यांच्यावरच्या आरोपांसंदर्भात सध्या उत्तरे द्यावी लागत आहेत, ती भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. विरोधी पक्षाच्या नेत्यांपैकी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी राजे, भास्कर जाधव वगैरे नेत्यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारून त्यांना राजकीय दृष्ट्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यातल्या एकाही नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अंगुली निर्देश केला नाही.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील फडणवीस आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना अजित पवारांना त्यातून वगळले. वाल्मीक कराडला महाराष्ट्रातला कुणीतरी बडा राजकारणी वाचवतोय, अशा आरोप त्यांनी केला. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवा अशी मागणी केली.
पण या सगळ्या प्रकरणात अजितदादा मात्र कुठेच सीन मध्ये आले नाहीत. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेण्याची त्यांनी तयारी दर्शवली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सुद्धा अजितदादांना अद्याप जाब विचारल्याची बातमी समोर आलेली नाही. मग त्यांच्यासारख्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या नेत्याची काही जबाबदारी नाही का??, असा सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App