नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा सरंजामदारांचा पक्ष नरेश अरोरा लोकशाही मार्गाने वाढवायला गेले आणि कॉन्ट्रॅक्ट गमावून बसले!!, हेच खरं म्हणजे राजकीय वास्तव समोर आले.
नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीने अजित पवारांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मेक ओव्हर करायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसला गुलाबी रंग दिला. अजित पवारांना गुलाबी जॅकेट घालायला लावले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी यांचा चांगला political connect व्हावा आणि तो दीर्घकाळ टिकावा, यासाठी नरेश अरोरांनी नियोजन केले होते. भाजपकडे हिंदुत्वनिष्ठ विकासाचे आणि शिवसेनेकडे आक्रमक हिंदुत्वाचे कार्ड होते पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे कुठलेच कार्ड नव्हते म्हणून नरेश अरोरांनी गुलाबी रंगाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला कनेक्ट मजबूत करायचा प्रयत्न केला. त्याचा विधानसभा निवडणुकीत मर्यादित अर्थाने लाभ सुद्धा झाला.
– पवार कुटुंबीयांचा अहंकार दुखावला
त्यामुळे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या कुठल्याच नेत्याला नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीची फी जड झाली नव्हती, पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि विशेषतः पवार कुटुंबीयांमध्ये नरेश अरोरा यांच्या विषयी अचानक आकस निर्माण झाला आणि त्याला कारणीभूत नरेश अरोरा यांच्या काही खेळीच ठरल्या. त्यांनी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना मदत केली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवान हालचाली केल्या. त्यामुळे बाकीच्या पवार कुटुंबीयांचा राजकीय अहंकार आणि नियोजन दुखावले गेले.
– राष्ट्रवादीची मूळ प्रवृत्ती सरंजामशाही
याचाच परिणाम म्हणून नरेश अरोरा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आकस निर्माण झाला. त्यातूनच त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या आरोपांचे इमले रचण्यात आले. वास्तविक नरेश अरोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय व्याप्ती वाढवायचा प्रयत्न केला होता. पण मूळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रचनेच्या ती विरोधातच होते कारण राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ राजकीय रचना आणि ओळख ही वेगवेगळ्या भागातून निवडून येणाऱ्या सरंजामदारांचा एकगठ्ठा पक्ष ही आहे. त्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस सर्वव्यापी व्हावी. वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये पोहोचावी आणि वेगवेगळ्या समाज घटकांमधले नेतृत्व तयार होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करावी हे मूळातच राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांचे political nature नव्हतेच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तो हेतू देखील नव्हता.
– राष्ट्रवादीतले सरंजामदार चिडले
काँग्रेस मास बेस्ड पक्ष आहे. भाजप केडर बेस्ड पक्ष आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वाभिमानाच्या नावाखाली सरंजामदारांच्या एकजुटीने निर्माण केलेला पक्ष आहे. त्यामुळे त्याला कुठल्याच लोकशाही मार्गाने वाढविता येणे शक्य नाही, हे नरेश अरोरांच्या लक्षात आले नाही म्हणूनच ते लोकशाही मार्गाने पक्ष वाढीसाठी वेगवेगळ्या राजकीय युक्त्या सुचवत राहिले त्यासाठी मोठमोठ्या फिया आकारात राहिले. अजित पवार होते तोपर्यंत त्यांचे सगळे धकून जात होते. पण त्यांनी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस मधले सरंजामदार चिडले आणि त्यांनी नरेश अरोरांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकले. पण या दरम्यान पवार कुटुंबीयांनी स्वतःचे नेतृत्व मात्र महाराष्ट्रात त्यांना स्वतःला हवे त्या मर्यादित अर्थाने प्रस्थापित करून घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App